रोहा, ता. २९ (बातमीदार) ः रोहा-कोलाड मार्गावरील पाले खुर्द येथील कुंडलिका नदीच्या तीरावर असलेल्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी येणाऱ्या ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून संबंधित प्रशासनाकडून तातडीने नवीन स्मशानभूमी बांधण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
कुंडलिका नदीकाठी पाले खुर्द ग्रामस्थांसाठी स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. विशेष म्हणजे, स्मशानभूमीवर पत्रे नसून उभे असलेले पाइपही गंजले आहेत. त्याचप्रमाणे सरण रचण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. आजूबाजूला झाडेझुडपे वाढली आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता तसेच आसनव्यवस्था नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. याबाबत वारंवार तक्रारी करून प्रशासनाकडून देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
पत्राशेडअभावी पावसाळ्यात लाकडे ओली होतात. यामुळे अंत्यसंस्कार करताना अडचणी येतात. पावसाळ्यात तर छत्रीचा आधार घेत अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यामुळे संबंधित प्रशासनाने स्मशानभूमीवर निवारा शेड टाकावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
रोहा ः कोलाड मार्गावरील पाले खुर्द येथील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे.