5 जुलै रोजी विजयी मोर्चा की सभा?… उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा काय?
GH News June 29, 2025 11:05 PM

राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राअंतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. सरकारने आता शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीच्या अहवालानंतर त्रिभाषा सूत्राबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे 5 जुलैला होणारा मनसे-ठाकरे गटाचा मोर्चाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत. आता याबाबत उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे.

उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, ‘मराठी माणसात विभागणी करायची आणि मराठी अमराठी असं करून अमराठी मतं भाजपकडे खेचायची असा त्यातला भाजपचा छुप अजेंडा होता. पण समाधानाची गोष्ट अशी की मराठी माणसाने समंजसपणाची भूमिका घेतली. भाषेला विरोध नाही तर सक्तीला विरोध आहे. सक्तीच्या विरोधात आंदोलन असल्याने त्यात फूट पडली नाही. मराठी माणसाची फूट लाभदायक ठरेल असं सरकारला वाटलं होतं.’

आता 5 तारखेला विजयी सभा…

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘5 तारखेला मोर्चा होऊ नये, तो मोर्चा फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. म्हणून त्यांनी तो जीआर रद्द केला.जीआर कोणी काढला होता. मागे हरिश्चंद्राची फॅक्ट्री पिक्चर आला होता. तसा भाजप खोट्याची फॅक्ट्री झाली आहे. अफवांची फॅक्ट्री झाली आहे. अफवा पसरवायच्या, खोटंनाटं कथानक तयार करायचं आणि मते मिळवायची हा भाजपचा धंदा झाला आहे. त्याला चपराक बसली आहे. मराठी माणसाला आवाहन आहे की संकटाची वाट पाहू नका. ही जाग कायम ठेवा. 5 तारखेला सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो. आता 5 तारखेला विजयी मोर्चा जल्लोष आणि सभा घेणार आहोत. याचं ठिकाण आम्ही लवकरच ठरवणार आहोत.

कुणाचीही समिती नेमली तरी हिंदी सक्ती होऊ देणार नाही

सक्ती मागे घ्यायला लावली आहे. 5 तारखेला मोर्चा काढायचा की सभा घ्यायची. कुठे घ्यायची हा सर्व कार्यक्रम दोन दिवसात सर्वांशी बोलून ठरवेल. सर्वांनी ठरवावं. मी सर्वांना विनंती करतो यात भाग घ्यावा. या समितीला काहीही अर्थ नाही. कोणाचीही समिती नेमली तरी सक्ती करू शकत नाही. सक्ती संपली. कुणाचीही समिती नेमली तरी ती होऊ देणार नाही. सक्ती होऊ देणार नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.