श्रीवर्धन, ता. २९ (वार्ताहर) ः श्रीवर्धन-अलिबाग एसटी आर्थिक उत्पन्नात घट या कारणास्तव श्रीवर्धन आगाराकडून बंद करण्यात आली होती, मात्र श्रीवर्धनमधील समाजसेविका प्रविता माने यांनी आगारप्रमुखांकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर श्रीवर्धन-अलिबाग बस १ जुलैपासून पूर्ववत सुरू होत आहे.
१९८७ मध्ये श्रीवर्धन आगाराची स्थापना झाल्यापासून श्रीवर्धन-अलिबाग बससेवा सुरू आहे. पहाटे ५:४५ वाजता श्रीवर्धन येथून मार्गस्थ होणारी बस म्हसळा, माणगाव, वडखळमार्गे अलिबाग येथे पोहोचत व सायंकाळी ६ वाजता श्रीवर्धनकडे परतीच्या प्रवासाला निघते.
प्रशासकीय कार्यालयांचे मुख्यालय अलिबागमध्ये असल्याने श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील सरकारी कर्मचारी आणि प्रवाशांसाठी ही बस उपयुक्त ठरत होती, मात्र कोविडनंतर श्रीवर्धन-अलिबाग बसला पुरेसे प्रवासी मिळत नाहीत, हे कारण देत ती बंद करण्यात आली. प्रवासीवर्गाने पाठपुरावा केल्यानंतर तीन ते चार दिवस अलिबागवरून बस सुरू करण्यात यायची, पण आर्थिक उत्पन्न कमी हे कारण देत पुन्हा बस बंद करण्यात येत होती.
श्रीवर्धन आगाराकडून श्रीवर्धन-अलिबाग बससेवा मंगळवारपासून (ता. १) पूर्ववत होत आहे. श्रीवर्धन येथून पहाटे पावणेसहाला सुटून माणगाव, वडखळमार्गे अलिबागला, तर अलिबाग येथून सायंकाळी ६ वाजता श्रीवर्धनला येण्यासाठी याच मार्गाने मार्गस्थ होईल.
आगारात पाच नवीन बस
एप्रिलमध्ये श्रीवर्धन आगाराकरिता पाच बसचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या वेळी रायगड विभाग नियंत्रक दीपक घोडे यांना प्रवाशांकडून विचारणा केली असता, तोट्यातील बस पुन्हा सुरू होणार नाही, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे प्रवासीवर्गाने नाराजी होती.