Raigad News : घराच्या बाजूची अळंबी खाल्ली, एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा; रायगडमध्ये खळबळ
Saam TV June 30, 2025 08:45 PM

रायगड : रायगड जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगाव गोठोसवाडी येथे विषारी अळंबी खाल्ल्यानं एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. सुभाष पवार, शिला पवार, सुप्रिया पवार, सावन पवार आणि चंद्रशेखर स्वामी अशी विषबाधा झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. घराच्या बाजूला उगवलेली अळंबी खाल्ल्यानंतर त्यांना लगेचच त्रास होऊ लागला, त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

माणगावयेथील पवार कुटुंबानं विषारी अळंबी खाल्ल्यानं पाच जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष पवार (वय ३६), शीला पवार (वय ३०), सुप्रिया पवार (वय ८), सावन पवार (वय १०) आणि चंद्रशेखर स्वामी (वय ४०) अशी विषबाधा झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

School Bus : बुधवारपासून राज्यभरात स्कूल बस बंद, बस मालकांनी पुकारले आंदोलन

विषबाधा झालेल्या सर्वांना तातडीनं सावंतवाडीउपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पवार कुटुंबियांनी घराच्या बाजूला उगवलेली अळंबी खाल्ली होती. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना त्रास जाणवू लागला. सुरुवातीला त्यांना माणगाव आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने १०८ रुग्णवाहिकेने त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. या पार्श्वभूमीवर 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'ने नागरिकांना आळंबी खाताना योग्य ती काळजी घेण्याच आवाहन केलं आहे.

दरम्यान, या घटनेत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, लक्ष्मण कदम आणि सुजय सावंत यांनी कुटुंबियांना मदत केली. जंगलात किंवा घराच्या आसपास उगवलेली कोणतीही आळंबी खाण्यापूर्वी ती विषारी नाही याची खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, अशा गंभीर घटना पुन्हा घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षता घ्यावी, असं आवाहन सामाजिक बांधिलकीनं केलं आहे.

Pune: विठुरायाच्या दर्शनाशाठी पंढरीला निघाली, भररस्त्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार अन् लुटमार; पुणे हादरलं
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.