टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंडवर कसोटी मालिकेतील दुसर्या सामन्यात दणदणीत, धमाकेदार, ऐतिहासिक अशी विशेषणं कमी पडतील असा अविस्मरणीय विजय मिळवला. बर्मिंगहॅममध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर 608 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 271 रन्सवर गुंडाळलं. भारताने यासह 336 धावांनी सामना जिंकला. टीम इंडियाने अशाप्रकारे इंग्लंडचा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला. भारताचा विदेशातील हा सर्वात मोठा विजय ठरला. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी करत पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवाची परतफेड केली.
भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील आणि शुबमनच्या नेतृत्वातील पहिलावहिला विजय ठरला. भारताच्या या विजयात कर्णधार शुबमन गिल, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज या जोडीने निर्णायक भूमिका बजावली. शुबमनने पहिल्या डावात द्विशतक तर दुसऱ्या डावात शतक केलं. तर सिराज आणि आकाश या जोडीने एकूण 17 विकेट्स घेतल्या. सिराज आणि आकाशने केलेल्या या कामगिरीमुळे भारताला मॅचविनर बॉलर जसप्रीत बुमराह याची अनुपस्थिति जाणवली नाही. बुमराहला या सामन्यातून वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विश्रांती देण्यात आली होती.
आता इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना 10 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. बुमराह या सामन्यात खेळणार की नाही? याबाबतची माहिती शुबमनने दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर दिली.
“डेफिनेटली अर्थात नक्कीच”, असं उत्तर शुबमनने जसप्रीत बुमराह तिसऱ्या सामन्यात खेळणार की नाही? या प्रश्नावर दिलं. शुबमनने सामना जिंकल्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनदरम्यान हे उत्तर दिलं.
बुमराह तिसऱ्या कसोटीत खेळणार
“नक्कीच. मी लॉर्डसमधील कसोटी सामन्यासाठी फार उत्सूक आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित क्रिकेट स्टेडियम आहे. लहानपणी प्रत्येकजण तिथं खेळण्याचं स्वप्न पाहतो. आपल्या देशाचं लॉर्ड्समध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळणं यापेक्षा दुसरा कोणताही सन्मान नाही”, असंही शुबमनने म्हटलं.