भारत इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसरा दिवशीही चेंडू बदलण्यावरून वाद झाला. ड्यूक चेंडू लगेच खराब होत असल्याने बदलण्याची वेळ येत आहे. त्यामुळे स्लो ओव्हर रेटचा मुद्दा तापला आहे. या दरम्यान समालोचन करणाऱ्या रवि शास्त्री यांनी चेंडू बदलल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला. नियमानुसार, चेंडू बदलताना पंच चेंडू साच्यातून टाकून तपासतात. जर त्या साच्यातून चेंडू बाहेर पडला तर बदलला जात नाही. जर अडकला तर मात्र चेंडू बदलला जातो. अनेकदा खेळाडू चेंडूचा आकार बदलल्यानंतर पंचांकडे चेंडू बदलण्यासाठी घेऊन जातात. असं करताना लॉर्ड्सवर कर्णधार शुबमन गिल आणि पंचांमध्ये वाद झाला होता. तिसऱ्या दिवशीही असंच चित्र पाहायला मिळालं. पण चेंडू बदलण्याची प्रक्रिया पाहून समालोचक रवि शास्त्री भडकले. कारण बॉक्समध्ये ठेवलेले पाच चेंडू साच्यातून बाहेर निघण्याच्या चाचणीत फेल गेले. हे चित्र पाहून रवि शास्त्री यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
रवि शास्त्री सांगितलं की, ‘हे जे काही चाललं आहे समजणं कठीण आहे. आश्चर्य वाटते की, त्यांनी पाच चेंडू तपासले आणि पाचही चेंडू त्या साच्यातून बाहेर गेले नाहीत. मग ते चेंडू त्या बॉक्समध्ये काय करत होते?’ रवि शास्त्री यांनी उचलेला मुद्दा योग्य आहे असंच म्हणावं लागेल कारण ते चेंडू जर साच्यातून बाहेर गेले नाहीत तर ते खराब आहेत असा अर्थ निघतो. त्यामुळे रवि शास्त्री यांनी उचलेला मुद्दा योग्यच आहे असं क्रीडाप्रेमी म्हणत आहेत.
ड्यूक बॉल हा दोन्ही संघांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण त्या चेंडूचा आकार लवकर खराब होतो. यामुळे रणनितीत वारंवार बदल करावा लागतो. इतकंच 10 षटकानंतरच चेंडू बदलण्याची वेळ येते. अनेक दिग्गज खेळाडूंनी या चेंडूच्या वापरावर टीका केली आहे. इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टूअर्ट ब्रॉडने 2020 मध्ये ड्यूक बॉलवर टीका केली होती. नवा चेंडूही जास्त काळ टिकत नसल्याचं सांगितलं. इतकंच काय तर लगेच सौम्य होतो. या सामन्यात मोहम्मद सिराजनेही चेंडूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.