Shardul Thakur : कॅप्टन शुबमनचा मनमानी कारभार? शार्दूल ठाकुर म्हणाला…
GH News July 25, 2025 08:10 PM

इंग्लंडने टीम इंडिया विरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात अप्रतिम सुरुवात केली. बेन डकेट आणि झॅक क्रॉली या सलामी जोडीने 166 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला बॅकफुटवर ढकललं. इंग्लंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स गमावून 225 धावा केल्या. टीम इंडियाने पहिल्या डावात 358 धावा केल्या. इंग्लंड दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तोवर 133 धावांनी पिछाडीवर आहे. इंग्लंडच्या फलंदाजांनी वेगाने धावा केल्या. टीम इंडियाचा ऑलराउंडर शार्दूल ठाकुर याने 5 ओव्हरमध्ये 35 धावा लुटवल्या. मात्र शार्दूलने स्वत:चा बचाव केला. शार्दूलने कर्णधार शुबमन गिल याच्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कर्णधार शुबमनचा मनमानी कारभार सुरु आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

शार्दूल ठाकुर काय म्हणाला?

शार्दूलने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बॉलिंगचा बचाव केला. “बॉलिंग कुणाला द्यायची हा कॅप्टनचा निर्णय असतो. ते माझ्या हातात नाही. कुणी केव्हा बॉलिंग करायची हे कॅप्टन ठरवतो. मी आज आणखी 2 ओव्हर टाकू शकलो असतो, मात्र तो कॅप्टनचा निर्णय आहे. 2 सामन्यांनंतर कमबॅक करताना लय प्राप्त करणं अवघड ठरतं, मात्र मी अनुभवाचा वापर करुन प्रयत्न करतो”, असं शार्दूलने म्हटलं.

शार्दूलच्या या वक्तव्यामुळे कर्णधार शुबमनच्या काही निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच वॉशिंग्टन सुंदर यालाही बॉलिंग न देण्याच्या निर्णयावरुन अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सुंदरने लॉर्ड्समध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात 4 विकेट्स घेतल्या होत्या. इंग्लंडच्या फलंदाजांनी भारताच्या इतर गोलंदाजांची धुलाई केली. त्यानंतरही शुबमनने दुसऱ्या दिवशी सुंदरला एकही ओव्हर दिली नाही. त्यामुळे शुबमनने असं का केलं? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

रवींद्र जडेजा याने 1 विकेट घेत पीच स्पिनर्ससाठी मदतशीर असल्याचं दाखवून दिलं. मात्र त्यानंतरही गिलने सुंदरला बॉलिंग का दिली नाही? हा प्रश्न राहुन राहुन उपस्थित केला जात आहे. या दरम्यान पत्रकार परिषदेत ऋषभ पंत याच्या बॅटिंगबाबत प्रश्न करण्यात आले.

दुखापतीनंतरही पंत बॅटिंगसाठी का आला?

टीम इंडियाचा उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत दुखापतीनंतरही बॅटिंगसाठी आला. पंतने 75 बॉलमध्ये 54 रन्स केल्या. शार्दूलने पंतला बॅटिंगसाठी पाठवण्यावरूनही प्रतिक्रिया दिली. “पंतला बॅटिंगसाठी पाठवायचं ही आमची योजना होती. वैद्यकीय पथकाने चांगली कामगिरी केली. मात्र त्याला (पंत) अजूनही त्रास होत आहे”, असंही शार्दूलने म्हटलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.