डायबिटीजसारख्या गंभीर आजाराबद्दल प्रत्येकाला योग्य माहिती असणं आवश्यक आहे. रक्तातील साखरेचं (ब्लड शुगर) प्रमाण किती असलं की ते सहज, नॉर्मल मानलं जातं, किती असलं की मधुमेहाची चाहुल असते. त्याला प्री-डायबिटिक स्थिती म्हणता येते? कोणत्या पातळीवर डायबिटीजचं निदान केलं जातं या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करुयात.
भारत मधुमेहाची राजधानी
भारतात मधुमेहाची झपाट्याने लागण झाली असं वैद्यकीय क्षेत्रात म्हटलं जातं. कारण समाजात हा रोग झपाट्याने वाढत आहे. ही एक अत्यंत गंभीर आरोग्य समस्या ठरत आहे. भारताला मधुमेहाची राजधानी (Diabetes Capital) म्हटलं जातं, इतके त्याचे रुग्ण देशात आढळतात. अगदी अबालवृद्धांना या रोगांने विळखा घातला आहे.
भ्रमाने मोठे नुकसान
अनेकदा आपण अगदी तंदुरुस्त आहोत. फिरायला जातो. चांगलंचुंगलं खातो, म्हणजे आपल्याला मधुमेह होणार नाही हा गोड भ्रम भारतीय समाजात अनेकांना आहे. त्यामुळे अनेक जण आरोग्यविषयक चाचण्यांकडे दुर्लक्ष करतात. पण एखाद्या दिवशी डोळ्यासमोर अंधारी येते, श्वास वर जातो आणि पुढं मधुमेहाने शरीरावर कब्जा केल्याचे लक्षात येते. या रोगावर अद्याप तरी रामबाण उपाय नसल्याचा दावा आहे. इतर उपायांनी आणि पथ्यपाणी जपल्यास तो नियंत्रणात मात्र राहतो.
मग रक्तातील साखरेचं प्रमाण किती असावं?
तर रक्तातील शुगर किती असली म्हणजे ती ‘नॉर्मल’ मानली जाते? आणि त्याने मधुमेहाचा धोका नसतो? तर शरीरातील साखरेचं प्रमाण (ब्लड शुगर लेव्हल) योग्य मर्यादेत असणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा शुगरचे प्रमाण जास्त किंवा खूप कमी होतं, तेव्हा मग आजाराला सामोरं जावं लागतं. मग मधुमेह शरीरावर आक्रमण करतो.
उपाशी पोटी करा चाचणी
तर उपाशी पोटी रक्तातील साखरेचं प्रमाण तपासलं जातं. त्याला Fasting Blood Sugar असे म्हणतात. रात्री पुरेशी झोप घेतल्यानंतर म्हणजे जवळपास 8 तास काहीही न खाता उपाशी पोटी ती करण्यात येते.
हे प्रमाण सांगेल साखरेचे प्रमाण
तर उपाशी पोटी रक्तातील साखर तपासल्यानंतर तुम्हाला मधुमेहाचा धोका लक्षात येईल.
सामान्य स्थिती : उपाशी पोटी रक्तातील साखरेचे प्रमाण 100 mg/dL पेक्षा कमी असेल, तर त्या व्यक्तीला मधुमेह, डायबिटीज नसतो.
मधुमेहाचं लक्षण : जर उपाशी पोटी रक्तातील साखरेचे प्रमाण 100 ते 125 mg/dL दरम्यान असेल, ही मधुमेहाला सुरुवात असल्याचे मानले जाते. म्हणजे ही धोक्याची घंटा आहे.
आता पथ्यपाण्याशिवाय उपाय नाही : तर उपाशी पोटी रक्तातील साखरेचे प्रमाण 126 mg/dL अथवा त्याहून अधिक असेल तर समजा आता पथ्यपाणी आणि उपायांना मित्र करणे गरजेचे आहे. मधुमेह झाल्याचे हे लक्षण आहे.