मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी आज विशेष NIA न्यायालयाने निकाल दिला. आरोप सिद्ध न झाल्याने न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न केला, आता त्यांनी संपूर्ण समाजाची माफी मागावी असं फडणवीस म्हणाले आहेत. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
काँग्रेसने माफी मागावी…
पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, काँग्रेसप्रणित युपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा नरेटीव सेट करण्याचा प्रयत्न केला होता. हिंदू व भगवा आतंकवाद आहे, हा प्रचार करण्याचा प्रयत्न केला. तो किती खोटा हे आज सिद्ध झाले. कोर्टाने पुराव्यानिशी आज सांगितले आहे. ज्यांवर कारवाई केली, त्यांची काँग्रेसने माफी मागावी. संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागावी. संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल काँग्रेसने माफी मागावी असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
युपीए सरकारने हे षडयंत्र तयार केले होते…
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, ‘पोलिसांना दोष देणार नाही. युपीए सरकारने हे षडयंत्र तयार केले होते. पोलिसांवर त्यांचा दबाव होता. 9/11 हल्ल्यानंतर जगभरात हा दहशतवाद तयार झाला होता. इस्लामिक दहशतवाद तयार झाला होता. त्याला विरोध म्हणून हिंदू व भगवा दहशतवाद असा प्रकार यूपीए सरकारने निर्माण केला होता’ असं म्हटलं आहे.
आतंकवादाचा रंग आणि जिहादचा रंग हा हिरवाच आहे – नितेश राणे
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, ‘हिंदू समाजाची बदनामी जी या मालेगावच्या प्रकरणातून करण्याचा प्रयत्न होता, त्यांना तोंडावर चपराक मिळाली आहे. त्यामुळे यापुढे हिंदू समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. परत परत एकच विषय सिद्ध होतोय की, आतंकवादाचा रंग आणि जिहादचा रंग हा हिरवाच आहे. कॉंग्रेसच्या काळात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर खोट्या केस करण्यात आल्या, त्यांना अडकवण्यात आलं.’
पुढे बोलताना राणे म्हणाले की, ‘हिंदुत्ववादी विचारसरणीचे राज्य आणि केंद्र सरकार असताना शक्य नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा हिंदू सुरक्षेत आहे हे पुन्हा सिद्ध झालंय. खरंतर या लोकांनी हिंदू समाजाची माफी मागितलं पाहिजे. यांनी मंदिरात जाऊन हिंदू समाजाची माफी मागावी. पुरावे यांच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले. ते कोर्टात कोणतेही पुरावे सिद्ध करू शकले नाहीत.’