भारतीय संस्कृतीमध्ये जेवणानंतर गोड खाण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. अनेक घरात जेवणानंतर गोड पदार्थ खाणे शुभ मानले जाते, पण याचे शरीरावर नेमके काय परिणाम होतात याबद्दल आपल्याला माहिती नसते.
जेवल्यानंतर लगचेच गोड पदार्थ खाल्ल्यास त्याचे अनेक चांगले आणि वाईट परिणाम होऊ शकतात. काही तज्ञांनी जेवणानंतर गोड खाण्याबद्दलचे फायदे तोटे सांगितले आहेत. आज आपण त्याबद्दलची माहिती घेऊ.
काही तज्ञांच्या मते, जेवणानंतर गोड खाण्याचे काही फायदे आहेत. जेवणानंतर गूळ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. गुळात असलेले पाचक एन्झाइम्स अन्न लवकर पचवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
गोड पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरात एंडोर्फिन नावाचे हार्मोन तयार होतात, ज्यामुळे मनाला आनंद आणि समाधान मिळते. गोड पदार्थांमधील साखरमुळे शरीराला ऊर्जा मिळते. ज्यामुळे थकवा किंवा अशक्तपणा जाणवत नाही. तसेच लगेच आराम मिळतो.
पण रोज गोड खाण्याची सवय असेल तर मात्र ती आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही दररोज गोड पदार्थ खात असाल तर तुमचे वजन वाढू शकते. गोड पदार्थांमध्ये जास्त कॅलरी असतात. रोज गोड खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त कॅलरी जमा होतात. ज्यामुळे वजन वाढू शकते.
रात्रीच्या वेळी मेटाबॉलिझ्मची क्रिया मंदावते. अशा वेळी गोड खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. ज्यामुळे मधुमेह होण्याचा धोका असतो. गोड खाल्ल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते. ज्यामुळे झोपेच्या हार्मोनवर परिणाम होतो. तुम्हाला शांत झोप लागत नाही.
काही तज्ज्ञांच्या मते, जेवणानंतर लगेच गोड खाल्ल्याने अन्न पचायला जास्त वेळ लागतो. ज्यामुळे ॲसिडिटी आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे दररोज जेवल्यानंतर गोड खाण्याऐवजी कधीतरी गोड खाणे जास्त फायदेशीर आहे.
जर तुम्हाला गोड खाण्याची सवय असेल, तर तुम्ही साखरेऐवजी गूळ, खजूर किंवा एखादे फळ खाऊ शकता. तसेच, जेवणानंतर गोड खाल्ल्यास थोडा वेळ शतपावली करणे आरोग्यासाठी चांगले ठरू शकते.