महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जुलै 2025 सत्राची पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश दिला आहे. लोढा यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ही घोषणा केली आहे. जुलै 2025 सत्रातील 2152 विद्यार्थ्यांना परीक्षेत नियमभंग केल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या जुलै 2025 सत्रातील परीक्षा AI आधारित Proctored तंत्रज्ञान वापरून MCQ स्वरूपात घेण्यात आल्या. 7 जुलै 2025 रोजी परीक्षा संपल्यानंतर 17 जुलै 2025 रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. या सत्रात 36,201 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 2152 विद्यार्थ्यांनी परीक्षा नियमभंग केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले होते.यापूर्वी झालेल्या सराव परीक्षेत विद्यार्थ्यांना AI सुरक्षा व Proctored प्रणालीबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली होती. मात्र असे असतानाही परीक्षेत नियमभंग झाल्याचे आढळून आले होते.
मंडळामार्फत प्रमाणपत्र, पदविका व प्रगत पदविका अभ्यासक्रम राबवले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मिळतात. केवळ नियमभंग या कारणास्तव विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महिनाभरात फेर परीक्षा घेण्याचे आदेश मंडळाला दिले आहेत.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या आदेशानंतर आता 23 ऑगस्ट 2025 रोजी पुनर्परीक्षा आयोजित केली जात आहे. राखीव निकाल असलेले व अनुत्तीर्ण विद्यार्थी यांना ही विशेष संधी दिली जात आहे. यापूर्वी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या सैद्धांतिक परीक्षा पारंपरिक स्वरुपात घेतल्या जात होत्या. या परीक्षांच्या निकालासाठी सुमारे 2 महिने लागत होते. विद्यार्थ्यांचा वेळ वाचवा यासाठी मंडळाने अत्याधुनिक AI Proctored तंत्रज्ञान वापरून या परीक्षा MCQ स्वरूपात घेण्याचा निर्णय घेतला होता. पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडली जात असून यासंदर्भात मंडळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच सूचना निर्गमित करत आहे.