सध्या देशात मत चोरीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात एक पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीतील अनियमिततेबद्दल गंभीर आरोप केले होते. या संदर्भात आज इंडिया ाघआडीतर्फे मोर्चा काढण्यात आला असून त्यामध्ये विरोधी पक्षाचे 300 हून अधिक खासदार सहभागी झाले असून संसदेच्या मकर द्वार ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येत आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी खासदारांच्या निवडणूक आयोगाकडे जाणाऱ्या मोर्चाला परवानगी दिलेली नाही. निवडणूक आयोगाबाहेर दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवान तैनात आहेत. बॅरिकेड्स उभारून मोर्चा थांबवण्यात आला आहे. इंडिया आघाडीच्या या मोर्चादरम्यान राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांचाही सहभाग असून निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि फलकही लावण्यात आले आहेत.
तत्पूर्वी, आज निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाच्या 30 सदस्यीय शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलावले. निवडणूक आयोगाने दुपारी 12 वाजता 30 जणांना भेटण्यासाठी बोलावले. भारतीय निवडणूक आयोगाच्या सचिवालयाने काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना पत्र लिहून दुपारी 12:00 वाजता चर्चेसाठी वेळ दिला. जागेच्या कमतरतेमुळे, कृपया जास्तीत जास्त ३० व्यक्तींची नावे द्या असे सांगण्यात आलं.
मतदार यादीवरून वाद सुरूच
मतदार यादीतील अनियमिततेवरून, घोटाळ्यावरून लढाई सुरूच आहे. राहुल गांधींसह सर्व विरोधी नेते निवडणूक आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केला आहे. त्यांनी कालपासूनच याबाबत मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत राहुल यांनी एक वेबसाइट देखील लाँच केली. तसेच त्यांनी लोकांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहनही केलं.
बातमी अपडेट होत आहे.