स्वांतत्र्य दिनी देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, महत्त्वाचे मुद्दे काय?
Tv9 Marathi August 15, 2025 10:45 PM

आज भारत आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ध्वजारोहण केले आणि महत्त्वपूर्ण भाषण दिले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आणि शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहिली. आपल्या भाषणात त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर भर दिला.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’चे विशेष कौतुक केले. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने दहशतवादी आणि पाकिस्तानच्या लक्ष्यांना उद्ध्वस्त करून भारताची ताकद जगाला दाखवून दिली. या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या सर्व अधिकारी आणि सैनिकांचे त्यांनी अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने प्रगती करत आहे. भारताची अर्थव्यवस्था एका दशकात ११व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. त्यांनी आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीवर भर दिला. जगातील सर्वोत्तम उत्पादने भारतात तयार करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

स्वदेशी उत्पादनांचा वापर करून आत्मनिर्भर भारताला बळकटी देण्यात येत आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या योगदानाचा गौरव केला. देशात येणाऱ्या परदेशी गुंतवणुकीपैकी ४०% गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. तसेच, वस्तू निर्मिती, निर्यात आणि स्टार्ट-अप्समध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. उत्तम शिक्षण आणि मानव संसाधन विकासाच्या जोरावर महाराष्ट्र देशाच्या विकासाचे नेतृत्व करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या. शेतकऱ्यांना आता ५ वर्षांसाठी मोफत वीज दिली जात आहे. तसेच, दिवसा १२ तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी प्रकल्प’ सुरू आहे, जो डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होईल. यानंतर, महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल जिथे शेतकऱ्यांना दिवसा १२ तास हरित वीज मिळेल. नदीजोड प्रकल्पांमुळे शेती आणि उद्योगांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.

नक्षलवाद्यांपासून गडचिरोली मुक्त

महाराष्ट्रातील सुरक्षा दलांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. गडचिरोली पोलिसांनी माओवादी आणि नक्षलवाद्यांपासून गडचिरोली मुक्त केले आहे. यामुळे गडचिरोली आता स्टील हब म्हणून विकसित होत आहे, जिथे देशात सर्वाधिक स्टील उत्पादन होईल. राज्यात विविध पायाभूत प्रकल्पांचे काम सुरू आहे. यामध्ये वाढवण बंदर, पुणे, नागपूर, गडचिरोली, अमरावती येथील विमानतळांचे आधुनिकीकरण आणि समृद्धी महामार्गासारखे प्रकल्प समाविष्ट आहेत. १,००० पेक्षा जास्त वस्ती असलेल्या गावांमध्ये सिमेंट-काँक्रीटचे रस्ते बांधले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संतांनी दाखवलेल्या वाटेवर महाराष्ट्र चालत राहील, असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.