गेल्या दोन-तीन दिवसांपासून संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. काही नागरिक घरात अडकले आहेत तर काहींना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने मुंबईत आज रेडअलर्ट जारी केला आहे. पुढील 48 तास महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पु्ण्याच्या घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आसला आहे. नुकताच राज्यात कोसळणाऱ्या पावसाबाबत पुण्याच्या वेधशाळेच्या हवामान शास्त्रज्ञांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते नेमकं काय म्हणाले चला जाणून घेऊया…
मुंबईत अचानक पाऊस का पडतोय?
पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये अचानक कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. तसेच जोराचे मान्सून वारे देखील सक्रिय झाले आहेत. या सगळ्यामुळे द्रोनीय रेषा तयार झाली आहे. ही रेशा उत्तर कोकणापासून सुरु होते ती केरळपर्यंत संपते. त्यामुळे कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि घाट माथ्यांवर मुसळधार पाऊस सुरु आहे. तसेच राज्यातील इतर भागांमध्ये रिमझिम पाऊस सुरु आहे.
वाचा: हिरो-हिरोईनच्याही तोंडाला येतो वास, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे असे होते? जाणून घ्या
पुढील दोन दिवसात काय होणार?
कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पुढील दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील समतल भागात ऑरेंज अलर्ट असून, दोन दिवसांनंतर येथे यलो अलर्ट लागू होईल. मराठवाड्यात आज ऑरेंज अलर्ट आहे, तर उद्यापासून यलो अलर्ट लागू होईल. विदर्भातही आज ऑरेंज अलर्ट असून, उद्या यलो अलर्ट असेल. त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांकडून पूरस्थितीचा आढावा
महाराष्ट्रातील सततच्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट दिली. त्यांनी राज्यातील पूरग्रस्त भागांचा आणि पावसाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही जोरदार पावसाचा प्रभाव कायम आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्षात रेड आणि ऑरेंज अलर्ट असलेल्या भागांची सविस्तर माहिती घेण्यात आली. याशिवाय, नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर कसे होत आहे आणि कोणत्या भागात लोक अडकले आहेत, याबाबतही चर्चा झाली. प्रशासनाला सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.