गेल्या चार दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत रात्रभर रिमझिम सुरू असलेल्या पावसाने पहाटे जोर पकडल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. हवामान विभागाने आज मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांत अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, रायगड आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळत आहे. सध्या रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवांसह रस्ते वाहतूकही पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
मुंबईत कुठे काय स्थिती?मुंबईत पहाटे पावसाचा जोर वाढल्याने अंधेरीत सब वे पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. मुंबईत सुरक्षेसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी वाहतूक थांबवली आहे. त्यामुळे मुंबईकरांचे पुन्हा हाल होत आहेत. मुंबईतील वीरा देसाई परिसरातील परिस्थिती कालपेक्षा आज वाईट आहे. काल या भागात फक्त गुडघ्यापर्यंत पाणी होते. पण हे पाणी कंबरेपर्यंत पोहोचले आहे. दोन मर्सिडीज कार पाण्यात बुडल्या आहेत. वीरा देसाईंचा हा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे, सर्वत्र फक्त पाणीच पाणी दिसते. अंधेरीतील आजूबाजूच्या सर्व भागातील सर्व सोसायट्यांमधील सर्व खालच्या घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे
मुंबईतील दादरच्या हिंदमाता आणि टीटी परिसरात गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक मंदावली आहे. यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. मुंबईतील स्वामीनारायण मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच सायन-पनवेल महामार्गावरही ठिकठिकाणी पाणी साचले असून, वाहतूक संथ झाली आहे. यासोबतच वसई-विरारमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले असून, मुंबई-अहमदाबाद महामार्गाकडे जाणारा रस्ताही जलमय झाला आहे.
दरम्यान मुंबईतील पावसाचा मुंबई लोकलवर पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. कल्याण, दादर आणि ठाणे यांसारख्या प्रमुख स्थानकांवरील रुळांवर पाणी साचल्याने गाड्या 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेच्या मार्गावर गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. तसेच हार्बर मार्गावरील मानखुर्द आणि कुर्लासारख्या सखल भागांत पाणी साचल्यामुळे लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.
पावसाची आकडेवारी आणि हवामान अंदाजआता मुंबईतील आतापर्यंतच्या पावसाची आकडेवारी समोर आली आहे. यानुसार 18 ऑगस्टच्या सकाळी 8 ते 19 ऑगस्टच्या सकाळी 8 वाजेपर्यंत मुंबई शहरात 186.43 मिमी पाऊस झाला आहे. तर पूर्व उपनगरांत 208.78 मिमी आणि पश्चिम उपनगरांत 238.19 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने आज मुंबई शहर आणि उपनगरांत अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज सकाळी 09:16 वाजता 3.75 मीटरची मोठी भरती येणार आहे. यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे.