डोंबिवलीत एका अज्ञात भामट्याने अनोखी शक्कल लढवत एका मोठ्या ज्वेलर्सच्या दुकानात फसवणूक केली आहे. त्याने पत्नीच्या वाढदिवसाचे निमित्त सांगून तब्बल १० लाख ३३ हजार रुपये किमतीचा सोन्याचा कंठीहार खरेदी केला. त्या बदल्यात बनावट सोन्याची नाणी देऊन दुकानदाराला लाखोंचा गंडा घातला. या घटनेने डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील सराफ व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
नेमकं काय घडलं?डोंबिवली पूर्वमधील टिळक रस्त्यावर असलेल्या श्री देवी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या दुकानात शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. श्री देवी ज्वेलर्स या दुकानात एका अनोळखी व्यक्तीने प्रवेश केला. यानंतर त्याने दुकानातील महिला कर्मचारी पूजा विनायक दळवी यांना पत्नीचा वाढदिवस असल्याचे सांगितले. तसेच त्याने मला पत्नीसाठी एक सुंदर आणि भारदस्त सोन्याचा हार घ्यायचा आहे, असे सांगितले. यानंतर पूजा यांनी दुकानातील विविध हार दाखवले. त्याने पूजा यांच्याकडून वेगवेगळे हार पाहिले. अखेर त्याला १० लाख ३३ हजार रुपये किंमतीचा एक कंठीहार आवडला.
या हाराची किंमत निश्चित झाल्यावर त्याने त्या हाराच्या बदल्यात त्याच्याजवळील सोन्याची नाणी देऊ, असे सांगितले. पूजा यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ती नाणी घेतली. यानंतर तो हार घेऊन तो दुकानातून बाहेर पडला. काही वेळानंतर, जेव्हा पूजा यांनी ती नाणी तपासणीसाठी एका अनुभवी ज्वेलर्सकडे पाठवली, तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले. त्याने दिलेली सर्व नाणी पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. तोपर्यंत तो भामटा पसार झाला होता. या फसवणुकीमुळे दुकानदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
गुन्हा दाखलया प्रकरणी महिला कर्मचारी पूजा दळवी यांनी तातडीने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा (कलम ४२०) दाखल केला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दुपारची वेळ साधून हा प्रकार केला. अनेकदा दुपारी दुकान मालक आणि कर्मचारी जेवणासाठी बाहेर असतात. त्यांची संख्या कमी असते, याच संधीचा फायदा घेऊन अशा घटना घडतात. गेल्या दोन वर्षांत कल्याण-डोंबिवली परिसरात महिलांच्या वेशातील किंवा बुरखा घालून आलेल्या चोरट्यांनी दुकानातून दागिने चोरल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या नव्या प्रकारच्या फसवणुकीने सराफ व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे सराफ व्यावसायिकांना अधिक सावध राहण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.