समस्या सोडवण्यासाठी
गावभेट कार्यक्रम
राजापूर, ता. १० ः घरकुल योजनेतून बांधल्या जाणाऱ्या घरांमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचे आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाले आहे. पुढील काळात प्रशासन व जनप्रतिनिधी यांनी समन्वय साधत अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवावी, असे आवाहन आमदार किरण सांमत यांनी केले. तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी, ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच गावभेट कार्यक्रम राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील महाआवास अभियानाच्या तालुकास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य राजू कुरूप, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले, राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय ओगले, गटविकास अधिकारी जाधव, भरत लाड आदी उपस्थित होते. या प्रसंगी पुरस्कार विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.