मिरचीला बाजारात भाव मिळेना
निर्यात घटल्याचा शेतकऱ्यांना फटका
वाशी, ता. १४ (बातमीदार)ः विक्रमी उत्पादन झालेल्या मिरचीची निर्यात घटल्याने स्थानिक बाजारपेठांमध्ये भाव घसरले आहेत. परिणामी, मिरचीच्या घसरत्या भावाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता. १२) २१२ टन मिरचीची आवक आली. त्यामुळे महिनाभरापूर्वी ४० ते ७६ रुपये किलो असलेली मिरची घाऊक बाजारात १० ते ४० रुपयांना विकली जात आहे, तर किरकोळ बाजारात सध्या मिरची ५० ते ७४ रुपये किलोने विकली जात असून, पुढील दिवसात भाव आणखी घसरू शकतात, अशी भीती व्यापारी व्यक्त करत आहेत.
-----------------------------------------
यंदा मुबलक उत्पादन
मिरचीचे प्रमुख उत्पादन नंदुरबारसह काही जिल्ह्यात होते. यंदा उत्पादन मुबलक झाले असले, तरी निर्यात कमी झाल्याने देशांतर्गत बाजारपेठेत आवक वाढली. त्यामुळे भाव निम्म्यावर आल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
-----------------------------
चार महिन्यांतील घसरण
महिना भाव
जून २४ ते ५०
जुलै ४० ते ७६
ऑगस्ट ४० ते ७६
सप्टेंबर १० ते ४०