विमानाच्या चाकाजवळ बसून काबुलवरुन दिल्लीला पोहचला 13 वर्षांचा मुलगा,जीवंत पाहून डॉक्टर झाले हैराण
Tv9 Marathi September 23, 2025 02:45 AM

देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण प्रसिद्ध आहे. अफगाणिस्तानातील एक मुलगा विमानाच्या चाकाजवळ बसून काबुलहून दिल्लीला पोहचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्ली एअरपोर्टच्या टर्मिनल तीनवर अधिकाऱ्यांना या मुलाला प्रतिबंधिच क्षेत्रात फिरताना पाहिले आणि त्याची चौकशी केली त्यानंतर त्याने हा धक्कादायक खुलासा केला आहे.

१३ वर्षांच्या या मुलाला गुपचूपपणे इराणला जायचे होते. परंतू तो चुकीने भारतात जाणाऱ्या विमानात अशा प्रकार लपला. त्यामुळे तो थेट दिल्लीला पोहचला. या घटनेनंतर काबुल एअरपोर्टवरील सुरक्षेसंदर्भात नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.

द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार के.ए.एम. एअर फ्लाईट क्रमांक आर.क्यू-4401 ला काबुल ते दिल्ली यायला 94 मिनिटे लागली. या दरम्यान हा अफगाणी मुलगा 94 मिनिटे मिनिटे विमानाच्या पाठच्या चाकाच्यावरील भागात लपून राहिला. हे विमान भारतीय वेळेनुसार काबूलहून सकाळी 8:46 वाजता रवाना झाले आणि सकाळी 10:20 वाजता दिल्लीच्या टर्मिनल 3 वर पोहचले.

चाकापर्यंत कसा पोहचला ?

या अफगाणी मुलाने सांगितले की त्याने काबुल विमानतळावर प्रवाशांच्या मागे गाडी चालवून प्रवेश केला. त्यानंतर विमान सुटण्याच्या वेळेत व्हीलमध्ये तो लपला. हा मुलगा अल्पवयीन असल्याने सध्या त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

व्हिल वेलमध्ये प्रवास अशक्य

तज्ज्ञांच्या मते व्हिल व्हेल मध्ये प्रवास करणे जवळपास अशक्य असते. विमान हवेत उडाल्यानंतर ऑक्सिजन लेव्हल खूपच कमी होते. आणि वरची थंडीही भरपूर असते. याशिवाय चाकाजवळ जातात त्याच्या आत अडकून मृत्यू देखील होऊ शकतो.

कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी टीएनआयआयला सांगितले की विमानाने उड्डाण घेतल्यानंतर व्हील बेचा दरवाजा खुला रहातो. चाक आत जाते आणि हा दरवाजा पुन्हा बंद होतो. हा मुलगा शक्यता आहे की या बंद जागेत घुसला असेल, जेथे दबाव जास्त असतो. आणि तापमान प्रवासी केबिन सारखे असावे. तो स्वत:ला वाचवण्यासाठी आतल्या बाजूला चिकटून लपला असावा. ते म्हणाले की अशा स्थितीशिवाय 30,000 फूट उंचीवर जीवंत राहाणे अशक्य आहे, कारण येथे तापमान खूपच कमी असते.

डॉक्टरांचे काय म्हणणे ?

चंदीगडच्या पीजीआयएमईआरचे असोसिएट प्रोफेसर डॉ. रितिन मोहिंद्रा यांच्या मते 10,000 फूट उंचीवर ऑक्सीजनची पातळी खूपच कमी असते. यामुळे काही मिनिटात व्यक्ती बेशुद्ध पडू शकते. विमान उंचीवर जाताच मृत्यू होऊ शकतो. -40°C आणि -60°C दरम्यानच्या अतिथंड तापमानात एका मिनिटात शीतदंश आणि त्यानंतर लागलीच घातक हायपोथर्मिया होऊ शकतो. व्हिल बेसमध्ये बसून प्रवास करणाऱ्यांपैकी पाच लोकांपैकी केवळ एक वाचू शकतो.

भारतीय एअरपोर्टवरील दुसरे प्रकरण

भारतीय एअरपोर्टवर व्हीलबेसमध्ये बसून प्रवास करण्याचे हे दुसरे प्रकरण आहे. या आधी 14 ऑक्टोबर 1996 रोजी प्रदीप सैनी ( 22) आणि विजय सैनी (19) नावाचे दोन भाऊ दिल्ली ते लंडन अशा प्रवासात ब्रिटीश एअरवेजच्या बोईंग 747 विमानाच्या व्हील बेस मध्ये लपले होते. लंडनला पोहचताच प्रदीप वाचला तर विजय याचा मृत्यू झाला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.