मोठी बातमी! आता 'टीईटी' उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनाच पदोन्नती; नोकरी टिकविण्यासाठीही आता शिक्षकांना 'टीईटी' उत्तीर्ण व्हावीच लागणार, वाचा...
esakal October 30, 2025 12:45 AM

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गावर नियुक्त शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने ‘टीईटी’चे बंधन घातले आहे. त्यामुळे सध्या शिक्षकांमधून सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्ताराधिकारी होणारी पदोन्नती थांबली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना ‘टीईटी’ उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षाची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबर रोजी राज्यभरात होणाऱ्या ‘टीईटी’साठी खुद्द लाखभर शिक्षकांनी देखील अर्ज केले आहेत. दरम्यान, राज्य शासनाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मार्ग काढला जाईल, अशी आशा शिक्षकांना आहे.

काही शिक्षक संघटनांनी निर्णय रद्द करावा म्हणून आंदोलने देखील केली आहेत. मात्र, केंद्र शासनाची भूमिका व सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, यावर राज्य शासनाला मार्ग काढता येणार नाही, असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण व्हावीच लागेल, अशी सद्य:स्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायम राहिल्यास पुढच्या शैक्षणिक वर्षात दोनवेळा ‘टीईटी’ घेतली जाऊ शकते. त्यात संबंधित शिक्षकांना ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावी लागेल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पदोन्नतीची प्रक्रिया थांबली, आता मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व शिक्षकांना ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. तूर्तास, शालेय शिक्षण विभागाने न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षकांच्या पदोन्नती थांबविल्या आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेकडील काही मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांना त्या निर्णयामुळे पदोन्नती देता आलेली नाही. शालेय शिक्षण विभागाकडून त्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना येतील, त्यानुसार आगामी काळात कार्यवाही केली जाईल.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

शेकडो शाळांचे मुख्याध्यापक प्रभारी

पदोन्नतीसाठी देखील ‘टीईटी’ची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या (मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्ताराधिकारी) पदोन्नती तातडीने थांबविल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सुमारे ५०० हून अधिक जिल्हा परिषदेच्या व खासगी अनुदानित शाळांचे (इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा) मुख्याध्यापक प्रभारी आहेत. त्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या ३२ शाळा आहेत. ‘टीईटी’ उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांनाच सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.