राज्यात मराठी-अमराठीचा वाद कित्येक दिवसांपासून सुरू आहे, त्यावर विविध राजकीय पक्षांनी भूमिकाही मांडल्या आहेत. मात्र हाच वाद एका तरूणासाठी अगदी जीवघेणा ठरला आहे. लोकल ट्रेनमध्ये हिंदी बोलल्यावर, मराठी येत नाही का असं विचारत झालेल्या वादानंतर एका 19 वर्षांच्या तरूणाला टोळक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्या तरूणाने घरात येत टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या (Crime news) केली. लोकलमधील हिंदी-मराठी वाद आणि झालेली मारहाण यामुळेच आपल्या मुलाने मृत्यूला कवटाळत आत्महत्या केली असा आरोप त्यांच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस स्टेशनमध्ये तशी तक्रारही दाखल करण्यात आली असून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
नेमकं काय झालं ?
मिळालेल्या माहितीनुसार, अर्णव खैरे असे मृत मुलाचे नाव असून तो अवघ्या 19 वर्षांचा होता. तो, त्याची आई, भाऊ आणि वडील जितेंद्र खैर यांच्यासह कल्याणमधील कोळसेवाडी परिसरातील इमारतीमध्ये रहात होता. मुलंडमधील केलकर कॉलेजमध्ये सायन्स शाखेत प्रथम वर्षाचं शिक्षण घ्यायचा. त्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 तारखेला तो नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढला. फर्स्टक्लासचा पास संपल्आने तिकीट काढून तो जनरल क्लासमध्ये चढला. पण ट्रेनमध्ये गर्दीमुळे त्याच्यावर खूप प्रेशर येत होते, म्हणून समोरच्या व्यक्तीला हिंदीत एवढंच म्हणाला की, मेरे पे प्रेशर आ रहा है, आप थोडा आगे बढो ना. पण त्याचं बोलणं ऐकून आजूबाजूच्या लोकांनी त्याला कानाखाली मारली. मी सुद्धा मराठी आहे, असं मुलाने त्यांना सांगितल्यावर, मग तुला मराठी बोलायला काय होतं ? मराठी बोलण्याची लाज वाटते का ? असं म्हणत काही तरूणाच्या टोळक्याने त्याला बेदम मारहाण केली. मुलाने आपल्याला सगळी घटना फोन करून सांगितलं, असं त्याच्या वडीलांनी नमूद केलं.
घाबरल्यामुळे थेट खाली उतरला
माझा मुलगा मुलंडला तरणार होता परंतु त्या टोलक्याच्या दहशतीमुळे तो ठाण्याला उतरला आणि मग मागच्या लोकलने तो कॉलेजला गेला. पण मानसिक तणावात असल्याने, बर वाटत नसल्याने तो फक्त प्रॅक्टिकल अटेंड करून घरी परत आला. त्याचं वडिलांशी दुपारीही बोलणं झालं. त्यानंतर त्याचे वडील संध्याकाळी 7 वाजता घरी आले, पण घराचा दरवाजा बंद होता, त्यांनी मुलाला आवाज दिला, तरीही कोणीच दरवाजा उघडला नाही. अखेर त्यांनी आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने , जोर लावून दरवाजा उघडला पण समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. बेडरूममध्ये त्यांच्या मुलाने सिलिंग फॅनला लाल रंगाच्या ओढणीने गळफास घेतल्याचे दिसल्याने ते हादरले आणि एकच टाहो फोडला.
मात्र तरीही त्यांनी मुलाला लगेच खाली उतरवंल आणि अँब्युलन्सने कल्याण पश्चिमेच्या रूख्मीणीबाई हॉस्पीटलमध्ये नेल. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं, असं त्याच्या वडिलांनी सांगितलं. त्या टोळक्याच्या मारहाणीमुळे दहशतीखाली, मानसिक तणावात येऊनच आपल्या मुलाने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगत याप्रकरणी त्या मुलांवर गुन्हा दाखल करावा, योग्य ती चौकशी करावी अशी मागणी त्यांन केली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्टेशनमधअये तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत