IND vs BAN : बांगलादेशची कडक बॅटिंग, भारतासमोर 195 धावांचं आव्हान, कोण पोहचणार फायनलमध्ये?
Tv9 Marathi November 22, 2025 01:45 AM

एसीसी मेन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 स्पर्धेत उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात भारत विरुद्ध बांग्शदेश आमनेसामने आहेत. बांगलादेशने या सामन्यात भारतासमोर धुव्वादार बॅटिंग केली. बांगलादेशने भारतासमोर 195 धावांचं आव्हान ठेवलं आहे. बांगलादेशने 6 विकेट्स गमावून 194 धावा केल्या. बांगलादेशसाठी ओपनर हबीबूर सोहन याने सर्वाधिक धावा केल्या. हबीबूरने 65 धावांचं योगदान दिलं. तर एसएम मेहरुब याने अखेरच्या क्षणी नाबाद 48 धावांची खेळी करत फिनिशिंग टच दिला. त्यामुळे बांगलादेशला 194 धावांपर्यंत पोहचता आलं. आता टीम इंडिया या धावांचं आव्हान पूर्ण करण्यात यशस्वी ठरणार की बांगलादेश फायनलचं तिकीट मिळवणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

भारताने टॉस जिंकून बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं. बांगलादेशला हबीबूर सोहन आणि जिशान आलम या सलामी जोडीने आश्वासक सुरुवात करुन दिली. या दोघांनी 43 धावांची भागीदारी केली. जिशान आलम याने 26 धावा केल्या. त्यानंतर झवाद अब्रार 13 धावांवर बाद झाला. भारताने बांगलादेशला 76 धावांवर दुसरा झटका दिला. त्यानंतर कॅप्टन अकबर अली हबीबूर सोहन या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 32 रन्सची पार्टनरशीप केली. अकबर अली याने 9 धावा केल्या. भारताने या तिसर्‍या विकेटसह जोरदार कमबॅक केलं.

भारताने बांगलादेशला 22 धावांच्या मोबदल्यात 4 झटके दिले. अकबरी अली 9, अबु हैदर 0, हबीबुर सोहम 65 आणि महिदुल इस्लाम याने 1 धावा केल्या. त्यामुळे बांगलादेशची 2 बाद 108 वरुन 6 आऊट 130 अशी स्थिती झाली. त्यामुळे टीम इंडिया बांगलादेशचं 150 धावांपर्यंत पॅकअप करेल, अशी आशा चाहत्यांना होती.

सातव्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी

यासीर अली आणि एसएम मेहरुब या जोडीने कमाल केली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी करत भारताला जेरीस आणलं. या जोडीने 22 बॉलमध्ये जोरदार फटकेबाजी करत 64 रन्सची पार्टनरशीप केली. यासीर अली याने 9 बॉलमध्ये नॉट आऊट 17 रन्स केल्या. तर एसएम मेहरुब याने फक्त 18 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 1 फोरसह नॉट आऊट 48 रन्स केल्या.

भारतीय गोलंदाज निष्प्रभ

टीम इंडियाकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. मात्र सूयश शर्मा आणि हर्ष दुबे या दोघांचा अपवाद वगळता इतर चौघांनी 9 पेक्षा अधिकच्या इकॉनमीने धावा लुटवल्या. नमन धीर याने 2 ओव्हरमध्ये 33 रन्स लुटवल्या. रमनदीप सिंह याने 2 षटकांमध्ये 29 धावा दिल्या. या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. विजयकुमार वैशाख याने 4 ओव्हरमध्ये 51 धावा दिल्या. विजयकुमार विकेट घेण्यात अपयशी ठरला. गुरजनप्रीत सिंह याने 4 षटकांत 39 धावांच्या मोबदल्यात सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर हर्ष दुबे आणि सूयश शर्मा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.