सध्या बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ची धूम पहायला मिळतेय, ज्यामध्ये रणवीरसोबत अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन, राकेश बेदी यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची पाकिस्तानमध्येही जोरदार चर्चा आहे. खरंतर पाकिस्तानमध्ये ‘धुरंधर’वर बंदी घालण्यात आली आहे, तरीही 20 लाखांहून अधिक वेळा तिथे हा चित्रपट बेकायदेशीरपणे डाऊनलोड करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या 20 वर्षांत रणवीरचा हा चित्रपट पाकिस्तानमध्ये सर्वाधिक पाहिला गेलेला पायरेटेड बॉलिवूड चित्रपट बनला आहे. यादरम्यान नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने पाकिस्तानमधील टॉप 10 चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये चार भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. त्यात पहिल्या क्रमांकावर एका भारतीय चित्रपटानेच स्थान मिळवलं आहे.
रश्मिका मंदानाचा फ्लॉप चित्रपट पाकिस्तानमध्ये हिटपाकिस्तानमध्ये नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट हा अभिनेत्री रश्मिका मंदानाचाआहे. तिचा हा चित्रपट तेलुगू आणि हिंदीसह इतर पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला असला तरी पाकिस्तानच्या ओटीटीवर मात्र तो धुमाकूळ घालतोय. 7 नोव्हेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला रश्मिकाचा ‘द गर्लफ्रेंड’ हा चित्रपट पाकिस्तानमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिला जातोय. तो पहिल्या क्रमांकांवर ट्रेंड होतोय.
View this post on Instagram
A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)
नेटफ्लिक्सने जाहीर केलेल्या अधिक माहितीनुसार, ‘द गर्लफ्रेंड’ हा चित्रपट पाकिस्तानमधील ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होतोय. यामध्ये रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासोबत दीक्षित शेट्टी आणि अनु इमॅन्युएल यांसारख्या कलाकारांच्याही भूमिका आहेत. राहुल रवींद्रन दिग्दर्शित या चित्रपटाने जगभरात 27.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
चित्रपटाची कथा काय?‘द गर्लफ्रेंड’ची कथा भूमा या महाविद्यालयीन विद्यार्थिनीभोवती फिरते. जी विक्रम नावाच्या तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये असते. विक्रमला सर्व गोष्टी त्याच्या नियंत्रणात ठेवायला आवडतात, अगदी गर्लफ्रेंडसुद्धा. भूमा ही अत्यंत सौम्य स्वभावाची, लाजाळू मुलगी आहे, जी विक्रमच्या सर्व आदेशांचं पालन करते. परंतु या नात्यात जेव्हा तिची घुसमट होऊ लागते, तेव्हा ती स्वत:चा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर मात्र तिला विक्रमच्या जाचाला सामोरं जावं लागतं. या चित्रपटाची कथा मानसिक पैलूंचाही खोलवर शोध घेते.