‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रमातून २१ कच्चे बंधारे पूर्ण
रोहा, ता. २४ (बातमीदार) : वाढती पाणीटंचाई, घटती भूजलपातळी आणि अनियमित पावसामुळे ग्रामीण भागात गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू झालेला ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा उपक्रम महाराष्ट्रभर लोकचळवळीचे स्वरूप घेत आहे. रोहा तालुक्यात या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत २१ कच्चे बंधारे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहेत.
रामानंद संप्रदायाच्या माध्यमातून अध्यात्माबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. ‘तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा’ हा संदेश केवळ उपदेशापुरता न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवला जात आहे. जलसंवर्धन ही केवळ शासकीय जबाबदारी नसून समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, ही जाणीव या उपक्रमातून प्रभावीपणे निर्माण होत आहे.
ही सर्व कामे भक्तगणांच्या स्वयंस्फूर्त श्रमदानातून व स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून करण्यात आली आहेत. या बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार असून, विहिरी, बोअरवेल तसेच शेतीसाठी दीर्घकालीन लाभ होणार आहे. युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सेवाभावी कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम सामाजिक एकात्मतेचेही उत्तम उदाहरण ठरत आहे.
चौकट
बांधण्यात आलेले बंधारे
न्हावे-सोनखार - (७)
झोळांबे-लक्ष्मीनगर, कोकबन, मुकटे - (२)
रोहा, विरझोली, बारशेत, नागोठणे, पाटणसई, खारगाव, खांदार आणि वाली - प्रत्येकी १
एकूण - २१