BJP And NCP: महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी महायुतीमधील रस्सीखेच सुरु आहे. महायुतीत नेते आणि कार्यकर्त्यांची पळवापळवी नको असे ठरलेले असतानाही भाजपने मोठा डाव टाकला आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादीने (Ajit Pawar NCP) सरस कामगिरी दाखवली आहे. मराठवाड्यात तर दादांनी शिंदे गटाला मागे ढकलत आगेकूच केलेली आहे. पण आगामी निवडणुकीपूर्वी अजितदादांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांसह मित्रपक्षच करत असल्याचे चित्र आहे. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रदेश कार्याध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरेंचे ऑपरेशन लोटस सुरूच
ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश कार्याध्यक्ष,माजी मनपा गटनेते किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचा भाजपत प्रवेश झाला आहे. शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आम्ही भाजपत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मध्यरात्री हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला आहे.एकीकडे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शरद पवार गटासोबत युती केली असतानाच दुसरीकडे सोलापुरात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन हुकमी एक्के फोडले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन महत्वाचे माजी नगरसेवक आता भाजपत गेल्याने पक्षाला मोठे खिंडार पडले आहे.
लक्ष्मण ढोबळे यांची जयकुमार गोरे यांच्यावर टीका
दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली आहे. पैलवान गडी असल्याने फार खोलात जाऊन ते अभ्यास करत नाहीत, सत्तेत असताना पराभव का झालं याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असा टोला ढोबळे यांनी लगावला.मनगटशाहीच्या जोरावर ते रेटून बोलतात, पण नियोजन केल्याचे मात्र जाणवलं नाही, आलेलं अपयश कशाचं कारण आहे, पंढरपूर, सांगोला पराभूत का झालो यांचा विचार त्यांनी केलेला नाही, अशी टीका सोलापूरचे माजी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी विद्यमान पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चार आमदार असताना का पराभव झाला याबाबतीत तुम्ही आमदारांनाच विचारा, माझ्याकडे कोणते अधिकार नसताना मी बोलणे उचित नाही, अशी प्रतिक्रिया देखील माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी दिली. दरम्यान राज्यातील 30 महामंडळाना कोणतेही निधी नाही, कर्मचाऱ्यांची नियुक्ती नाही त्यामुळेच सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लागतं नाहीत.यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी दिली.