Chanakya Niti : जर तुमच्याकडेही असेल हा गुण तर आयुष्यात कधीच तुमचा पराभव होणार नाही, चाणक्य काय म्हणतात?
Tv9 Marathi January 11, 2026 11:45 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच पैलूंवर विस्तृत लिखाण केलं आहे, माणसानं आदर्श जीवन कसं जगावं? याबद्दल त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मार्गदर्शन केलं आहे. चाणक्य म्हणतात आयुष्य म्हटलं की यश -अपयश आलंच. आपल्या भोवती असे अनेक लोक असतात, की ज्यांना एकदा जर अपयश आलं तर ते त्या अपयशानं खचून जातात, पुन्हा कधीच प्रयत्न करत नाहीत. मात्र त्यामुळे त्यांचं आयुष्यात खूप मोठं नुकसान होतं. तुम्हाला जेव्हा तुमच्या आयुष्यात अपयश येतं तेव्हा तुम्ही संयम ठेवला पाहिजे, पुन्हा नव्याने प्रयत्न केले पाहिजेत. कोणाला दुसऱ्या प्रयत्नात यश येईल, तर कोणाला तिसर्‍या प्रयत्नात यश येत. मात्र तुम्ही जर प्रयत्नच सोडून दिले तर मग मात्र तुम्ही कधीही यशस्वी होणार नाहीत, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. असे काही गुण आहेत, जे माणसाजवळ असतील तर त्याचा कधीही आयुष्यात पराभव होत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

नम्रता – चाणक्य म्हणतात नम्रता हा असा गुण आहे, तो जर तुमच्या आंगी असेल तर तुम्ही जग जिंकण्याची ताकद ठेवता. त्यासाठी त्यांनी काही उदाहरणं देखील दिली आहेत. चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही एखाद्या विहिरीमध्ये पाणी वर काढण्यासाठी बादली आत सोडता, तेव्हा त्या बादलीला आधी खाली वाकावं लागतं, जेव्हा ती वाकडी होते तेव्हाच तिच्यामध्ये पाणी येतं. नम्रता हा गुण देखील असाच आहे, आपण जेव्हा नम्र असू तेव्हाच आपल्याला कुठल्याही गोष्टीची प्राप्ती होते. जसं की विद्यार्थ्यांनी नेहमी नम्रतेनंच ज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे. जे नोकरदार असतात, किंवा व्यावसायिक असतात त्यांच्या डोक्यावर नेहमी बर्फ असावा तसेच त्यांच्या तोंडात साखर असावी, अर्थात त्यांच्याकडे नम्रता असावी असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. माणूस कितीही बलवान असेल आणि त्याच्या अंगात जर नम्रता नसेल तर त्याचा पराभव निश्चित असतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

संयम – चाणक्य म्हणतात माणसाजवळ आणखी एक गुण हवाच आणि तो म्हणजे संयम जर माणसाकडे संयम असेल तर, माणूस कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकू शकतो असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य म्हणतात की जेव्हा तुम्हाला वारंवार अपयश येतं तेव्हा खचून जाऊ नका, तर थोडं थांबा सयंम ठेवा आणि पुन्हा जोमाने कामाला लागा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.