रोहित शर्मा आऊट होताच, विराट कोहली प्रेक्षकांवर संतापला, तोंडून निघालं MS Dhoni चं नाव, नको नको
Marathi January 12, 2026 02:25 PM

भारत विरुद्ध न्यूझीलंड 1ली एकदिवसीय सामना विराट कोहली प्लेयर ऑफ द मॅच: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 93 धावांची शानदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. मात्र, विजयाचा आनंद साजरा करण्याऐवजी विराट एका वेगळ्याच कारणामुळे चाहत्यांवर नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्याच संघाचा खेळाडू बाद झाल्यावर चाहत्यांनी व्यक्त केलेला आनंद विराटने अनोखी समस्या असल्याचे म्हटले आहे.

नेमकं काय घडलं?

वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर हा सामना रंगला होता. डावाच्या नवव्या षटकात कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. सहसा जेव्हा भारतीय फलंदाज बाद होतो, तेव्हा मैदानावर शांतता पसरते. मात्र, रोहित बाद होताच संपूर्ण स्टेडियममध्ये जल्लोष सुरू झाला. प्रेक्षकांचा हा आनंद रोहित बाद झाल्याचा नसून, विराट कोहली फलंदाजीला येणार याचा होता. चाहत्यांच्या या वागण्यावर विराटने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

‘हे वागणं चुकीचं…’, विराट कोहली नक्की काय म्हणाला?

सामन्यानंतर बोलताना विराटने स्पष्ट केले की, आपल्याच सहकाऱ्याच्या विकेटचा असा जल्लोष होणे दुर्दैवी आहे. विराट म्हणाला, “मला हे अजिबात आवडलेलं नाही. आपल्याच संघाचा फलंदाज माघारी जात असताना प्रेक्षकांनी असा जल्लोष करणे योग्य नाही. मी चाहत्यांचा उत्साह आणि माझ्यावरचं प्रेम समजू शकतो, ते माझं भाग्यच आहे. पण मैदानावर येताना संघाची स्थिती काय आहे, यावर माझं लक्ष असतं.”

महेंद्रसिंग धोनीचा उल्लेख

चाहत्यांच्या या मानसिकतेबद्दल बोलताना विराटने चेन्नई सुपर किंग्स आणि एमएस धोनीचे उदाहरण दिले. विराटने आठवण करून दिली की, “MS Dhoni फलंदाजीला येणार म्हणून अनेकदा सीएसकेच्या (CSK) चाहत्यांनी आपल्याच फलंदाजांच्या विकेट्सवर आनंद साजरा केल्याचे मी पाहिले आहे. हे खेळाडूसाठी मानसिकदृष्ट्या चांगलं नसतं.”

विराटने गाजवला सामना

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने निर्धारित 50 षटकांत 8 गडी गमावून 300 धावा केल्या. प्रत्युत्तर, शुभमन गिल (56), विराट कोहली (93) आणि श्रेयस अय्यर (49) यांच्या खेळीमुळे भारताने एक षटक लवकर सामना जिंकला. केएल राहुल आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी 29 धावांच्या महत्त्वपूर्ण खेळी केल्या आणि संघाला 4 गडी राखून विजय मिळवून दिला. सामन्यानंतर, विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. हा किंग कोहलीचा 45 वा सामनावीर पुरस्कार होता आणि एकदिवसीय इतिहासात सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

हे ही वाचा –

Rohit Sharma News : फक्त 26 धावा… पण रोहित शर्माचा ‘सिक्सर किंग’ अवतार, असा वर्ल्ड रेकॉर्ड की क्रिकेट विश्व हादरलं, विक्रम मोडणे अशक्य

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.