यंदाची मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे बंधु एकत्र येऊन लढवत आहेत. विधानसभेला दोघांचा जनाधार मोठ्या प्रमाणात घटला. त्यामुळे पालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. मुंबईसह पुणे, नाशिक या ठिकाणी ते एकत्र निवडणूक लढवतायत. पण मुंबईवरच त्यांचा सर्वात जास्त फोकस होता. मुंबईत दुबार मतदानाचे प्रकार रोखण्यासाठी ठाकरे बंधुंनी भगवा गार्ड नेमलय.हे भगवा गार्ड मतदान केंद्राजवळ आहे. काही ठिकाणी त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. आता या भगवा गार्डवर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी जोरदार प्रहार केला आहे.
ठाकरेंचेभगवा गार्ड गोवंडी, मानखुर्द शिवाजी नगर, मालवणी, मोहम्मद अली रोडवर दिसत नाहीयत. सर्व हिंदुंच्या परिसरात हे भगवा गार्ड फिरताना दिसतायत. यातून उद्धव ठाकरेंची निती आणि नियत उघड होते, असा आरोप अमित साटम यांनी केला. गोवंडी, मानखुर्द शिवाजी नगर, मालवणी, मोहम्मद अली रोड हा मुस्लिम बहुल भाग आहे.
BMC ला परिवाराची जागीर समजणाऱ्यांच्या अस्तित्वाची ही लढाई
“मुंबई महानगरपालिकेला स्वत:च्या परिवाराची जागीर समजणाऱ्यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. त्यामुळे त्यांची धडपड दिसत आहे. गेल्या 11 वर्षात मुंबईकरांसाठी, मराठी माणसांसाठी खऱ्या अर्थाने जे काम झालं आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. वरळी बीडीडी चाळीत 160 फुटाच्या घरात राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी 560 फुटाचं घर देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं” असं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम म्हणाले.
आज त्यांना देवदेवता आठवले
“मुंबईकरांना हे चांगलं माहित आहे मराठी माणसाचा, मुंबई शहराचा विकास कोणी केला? मुंबई शहराची सुरक्षितता कोण अबाधित ठेऊ शकतं.मुंबादेवीचं दर्शन घेण्याचा अधिकार सर्व भक्तांना आहे. परंतु कोविडच्या काळात मंदिर बंद करणारे आज स्वत:च्या अस्तित्वासाठी देवाकडे, देवीकडे साकडं घालताना दिसतायत. आज त्यांना देवदेवता आठवले, हिंदुत्व आठवलं हे चांगलं आहे” असं टीका करताना अमित साटम म्हणाले.