हैदराबादमध्ये AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबई महापालिका निवडणूक निकालावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. महापालिकेत कोणाला समर्थन द्यायचय किंवा नाही? याचा निर्णय पक्ष स्तरावर होईल. कुठल्याही नगरसेवकाला स्वत:हून असा निर्णय घेता येणार नाही. ओवैसी यांनी AIMIM नगरसेवकांना इशाराही दिला. सोबतच महाराष्ट्राच्या मतदारांचेही आभार मानले.
“महापालिकेत कुठल्या पक्षासोबत आघाडी करायची की नाही? याचा निर्णय AIMIM पार्टी करेल. कुठलाही नगरसेवक स्वत:हून असा निर्णय घेऊ शकत नाही. कुठलाही नगरसेवक पार्टी लाइन सोडून असा निर्णय घेत असेल, तर त्याच्यावर कारवाई होईल” असं ओवैसी म्हणाले. मुंबई महापालिकेत भाजप किंवा उद्धव ठाकरे गटाचं समर्थन करण्याच्या मुद्यावर ओवैसी म्हणाले की, “जर कोणी एमआयएमला तोडण्याचा प्रयत्न करेल, तर पक्ष स्वत: ठरवेल पुढे काय करायचय. कोणाच्याही दबावाखाली निर्णय होणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं”
AIMIM पक्षाचे नगरसेवक कुठेही जाणार नाहीत
AIMIM ला फोडण्याचा प्रयत्न झाला, तर जनता त्यांना धडा शिकवेल असं ओवैसी म्हणाले. त्यांनी बिहारचं उदहारण दिलं. तिथेही पक्ष तोडण्याचा प्रयत्न झालेला. पण जनतेने असं करणाऱ्यांना सणसणीत चपराक लगावलेली. AIMIM पक्षाचे नगरसेवक कुठेही जाणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षाच्या मंजुरीशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नका असं त्यांनी पक्षाच्या सर्व नगरसेवकांना आवाहन केलं.
मुंबई महापालिकेत AIMIM चे किती नगरसेवक निवडून गेलेत?
मुंबई महापालिकेत AIMIM चे 8 नगरसेवक निवडून गेले आहेत. त्याशिवाय औरंगाबादमध्ये 33, अमरावती आणि अकोल्यामध्ये सुद्धा एमआयएमच्या नगरसेवकांनी विजय मिळवला आहे. एकनाथ शिंदे यांच्या वॉर्डमध्येही शिवसेना UBT नगरसेवकांनी विजय मिळवलाय असं ते म्हणाले.
महाराष्ट्रातून AIMIM चे किती नगरसेवक निवडून आलेत?
महाराष्ट्रातून AIMIM चे एकूण 125 नगरसेवक निवडून आले आहेत. ओवैसी यांनी त्या बद्दल महाराष्ट्राच्या मतदारांचे आभार मानले. पक्ष कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं त्यांनी कौतुक केलं. AIMIM यशामध्ये हिंदू बंधू, दलित आणि अन्य समुदायाचं सुद्धा योगदान आहे असं ते म्हणाले. जिंकून आलेले नगरसेवक जनतेला अपेक्षित काम करतील असा विश्वास ओवैसी यांनी व्यक्त केला.