मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू (Ajit Pawar Plane Crash) झाला. त्यानंतर राज्यासह देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राजकारणासह विविध स्तरातून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवारांचे टीकाकार समजले जाणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यावेळी भावुक झाल्याचं दिसून आलं. तर अजित पवारांच्या जाण्यामुळे आपल्याला वेदना झाल्याची प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बारामतीमध्ये अजित पवार यांच्या चार सभा होत्या. या सभांसाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे मुंबईहून बारामतीसाठी निघाले होते. यादरम्यान लँडिंगदरम्यान बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला. विमानाचा अपघात इतका भीषण होता की, त्यामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार असून त्यासाठी देशभरातून बडे नेते उपस्थित राहणार आहेत.
अजित पवार यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे भावुक झाल्याचं दिसून आलं. त्यावेळी अण्णा हजारे यांच्या डोळ्यात अश्रूही आल्याचं दिसून आलं. अजित पवारांचे दुर्दैवी निधन झाले हे शब्दांनी सांगता येत नाही असं अण्णा हजारे म्हणाले. समुद्राला आलेल्या भरतीसारखी जनसंख्या वाढत चालली आहे, मात्र त्यातली अजित पवारांसारखी माणसं हरवत चालली आहेत, हे देशाचं आणि समाजाचं मोठं नुकसान असल्याची भावना अण्णा हजारे यांनी व्यक्त केल्या.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही अजित पवारांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली. राजकारणात आपल्या कार्यकर्तृत्वाने दबदबा निर्माण करणारा बापमाणूस गेला, अजितदादा गेल्याच्या बातमीने मनाला खूप वेदना झाल्या. ही बातमी अत्यंत दुःखद असल्याची प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी दिली.
ही बातमी वाचा: