Budget 2026 : आता शाळेतच मिळणार रिल्स बनवण्याचे धडे, कंटेंट क्रिएशनसाठी सरकारची नवी योजना काय?
Tv9 Marathi February 01, 2026 05:45 PM

केंद्र सरकारने देशातील तरुणांसाठी डिजीटल युगात रोजगाराच्या नव्या संधी खुल्या केल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतीच अर्थसंकल्पात एक मोठी घोषणा केली आहे. येत्या २०३० पर्यंत भारताला सुमारे २० लाख सोशल मीडिया व्यावसायिकांची गरज भासणार आहे. ही वाढती संख्या आणि रोजगाराची संधी लक्षात घेता आता शाळा-महाविद्यालयांत कंटेंट क्रिएटर लॅब सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली. याद्वारे आता विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयांपासूनच कंटेट क्रिएटरचे प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू केली आहे.

सरकारची नवीन योजना काय?

सोशल मीडियाकडे आता केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून न पाहता एक करिअर म्हणून पाहिले जात आहे. यासाठी सरकारने काही ठोस पावलं उचलण्याची घोषणा केली आहे. यानुसार आता देशातील १५ हजार माध्यमिक शाळांमध्ये विशेष कंटेंट क्रिएटर लॅब (Content Creator Labs) स्थापन केल्या जाणार आहेत. शाळांशिवाय देशातील ५०० आघाडीच्या महाविद्यालयांमध्ये अशाच प्रकारच्या अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारल्या जाणार आहेत. या सर्व प्रयोगशाळांचे काम आणि देखरेख ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (IICT) या संस्थेमार्फत केले जाईल. या उपक्रमाला सरकारकडून थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे.

विद्यार्थी काय शिकणार?

केवळ व्हिडिओ बनवणे म्हणजे कंटेंट क्रिएशन नाही, तर त्यात अनेक तांत्रिक बाबींचा समावेश असतो. या लॅब्समध्ये विद्यार्थ्यांना खालील गोष्टींचे व्यावहारिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

  • व्हिडिओ एडिटिंग आणि पॉडकास्टिंग: आधुनिक सॉफ्टवेअरच्या मदतीने दर्जेदार व्हिडिओ आणि ऑडिओ निर्मिती
  • ग्राफिक डिझाइन आणि स्क्रिप्टरायटिंग: प्रभावी मांडणी आणि लेखन कौशल्य
  • डेटा अ‍ॅनालिटिक्स: प्रेक्षकांची पसंती आणि ट्रेंड्स समजून घेणे
  • डिजिटल मार्केटिंग आणि मुद्रीकरण (Monetization): सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्पन्न कसे मिळवायचे याचे तंत्र
  • नियम आणि नीतिमत्ता: कॉपीराइट कायदे आणि डिजिटल जगातील शिष्टाचार
भारताला ग्लोबल कंटेंट हब बनवण्याचे लक्ष्य

अर्थमंत्र्यांच्या मते, भारत सध्या जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया बाजारपेठांपैकी एक आहे. या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना घरबसल्या उत्पन्न मिळवण्याची आणि मोठ्या ब्रँड्ससोबत काम करण्याची संधी मिळेल. विशेष म्हणजे पदवी शिक्षणासोबतच हाताला डिजीटल कौशल्य मिळाल्यास बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. तसेच भारत जागतिक स्तरावर कंटेंट हब म्हणून नावारूपास येईल, असे निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.