अजित पवार कारने जाण्याऐवजी विमानाने का गेले? आदल्या रात्री काय घडलं? ड्राइव्हरने सर्वच सांगितलं
Tv9 Marathi February 03, 2026 07:45 PM

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात अकाली निधन झाले. अजित पवारांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित दादांच्या निधनानंतर त्यांच्या जवळचे अनेक व्यक्ती त्यांच्या आठवणी सांगताना दिसत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून अजित दादांसोबत सावलीसारखे सोबत असणारे त्यांचे खाजगी चालक श्यामराव मनवे यांनी त्यांच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. श्यामराव मनवे यांनी अजित दादांच्या निधनच्या आदल्या रात्री काय घडलं होतं, याबद्दलची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी अत्यंत भावूक आठवणींना उजाळा दिला आहे.

अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि खासगी ड्रायव्हर श्यामराव मनवे यांनी त्या शेवटच्या रात्री नेमके काय घडले आणि प्रवासाचे नियोजन कसे बदलले, याचा खुलासा केला आहे. श्यामराव मनवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही त्या रात्री बारामतीला येण्यासाठी सर्व तयारी केली होती. मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक संपवून दादा रस्तेमार्गे पुण्यात मुक्काम करणार होते. त्यानंतर सकाळी १० वाजता बारामतीमधील बैठकांना उपस्थित राहणार होते.

तू उद्या गाडी घेऊन पुण्याला ये…

“दादांची काळजी घेणाऱ्या शंकरने सर्व बॅगा आधीच गाडीत लोड केल्या होत्या. आम्ही प्रवासासाठी रस्ते मार्गाने बारामतीकडे येणार होतो. हा प्रवास निश्चित होता. मात्र, मंत्रिमंडळाची बैठक अपेक्षेपेक्षा जास्त लांबली. रात्री उशीर झाल्यामुळे दादा थकले होते. प्रवासातील थकवा टाळण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणी अजित दादांनी बारामतीला रस्तेमार्गाने जाणं रद्द केले. तू उद्या गाडी घेऊन पुण्याला ये. मी उद्या सकाळी विमानाने थेट बारामतीला जाईन आणि तिथून पुण्याला येईन”, असे अजित दादांनी श्यामराव मनवे यांना सांगितले.

श्यामराव मनवे हे २००९ पासून दादांसोबत आहेत. २०१३ मध्ये सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यावरही त्यांनी दादांची साथ सोडली नाही. यावेळी त्यांनी अजित दादांचा स्वभाव कसा होता, याबद्दलही सांगितले. लोकांना वाटायचे की दादा खूप कडक आहेत, पण तसे नव्हते. ते केवळ शिस्तीचे चाहते होते. जर त्यांनी सकाळी ६ ची वेळ दिली, तर आम्ही ५:३० ला हजर असायचो. विनाकारण ते कधीच कुणावर ओरडले नाहीत. त्यांना स्वच्छतेची आवड होती. माध्यमांचे प्रतिनिधी जेव्हा कव्हरेजसाठी बंगल्यावर येत, तेव्हा त्यांच्या चहा-पाण्याची विचारपूस खुद्द अजित पवार करायचे, असे श्यामराव मनवे म्हणाले.

दादा आपल्यातच आहेत…

मला जे दुःख होत आहे ते मी शब्दांत मांडू शकत नाही. माझे मन अजूनही हेच सांगतेय की दादा आपल्यातच आहेत, ते कुठेही गेलेले नाहीत, अशा शब्दांत श्यामराव मनवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एका नेत्याचा आणि त्याच्या विश्वासू चालकाचा हा प्रवास अशा प्रकारे संपेल, याची कल्पनाही कोणाला नव्हती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.