आयसीसी स्पर्धांमध्ये तसं पाहिलं तर टीम इंडियाची कामगिरी हवी तशी होत नव्हती. 1983 चा वनडे वर्ल्डकप जिंकल्यानंतर जेतेपदाची चव चाखण्यासाठी बराच कालावधी गेला. पण 2007 पासून टीम इंडियाचं चित्र पालटलं आणि खऱ्या अर्थाने अच्छे दिन सुरू आहे. त्याला मुहूर्त लाभला तो टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा.. 2007 साली टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली. आतापर्यंत या स्पर्धेचे 9 पर्व पार पडली आहे. यंदाचं दहावं पर्व आहे. 2007 सालापासून 2024 पर्यंतच्या 9 पर्वात भारताची कामगिरी कशी होती? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल. भारताने प्रत्येक पर्वात चांगली कामगिरी केली असं नाही. 2009, 2010 आणि 2012 च्या पर्वात निराशा पदरी पडली होती.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं पहिलंच पर्व होतं आणि भारताने जेतेपदावर नाव कोरलं. अंतिम सामन्यात पाकिस्तानशी लढत झाली आणि शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात जेतेपद मिळवलं. भारताने प्रथम फलंदाजी करताना 157 धावा केल्या होत्या. पण पाकिस्तानचा संघ 152 धावा करू शकला. यासह भारताने पहिल्या जेतेपदावर नाव कोरत इतिहास रचला.
टीम इंडियाची सलग तीन पर्वात निराशाजनक कामगिरी झाली. 2009 मध्ये तर इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिजने पराभूत केलं. त्यामुळे स्पर्धेतून पत्ता कट झाला. 2010 मध्येही तशीच स्थिती होती आणि सुपर 8 मध्ये जागा मिळवू शकला नाही. 2012 मध्ये पदरी निराशा पडली. या स्पर्धेत खऱ्या अर्थाने चांगल्या कामगिरी अपेक्षा होती. पण सुमार कामगिरीचं दर्शन घडलं.
टीम इंडियाने विराट कोहलीच्या नेतृत्वात 2014 मध्ये कमबॅक केलं. या स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी जबरदस्त राहिली. भारताने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. पण श्रीलंकेकडून पराभव सहन करावा लागला. भारताने विजयासाठी दिलेलं आव्हान श्रीलंकेने 18 षटकात पूर्ण केलं.
टी20 वर्ल्डकप 2016 च्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने जागा मिळवली होती. भारतात स्पर्धा असल्याने जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. भारताने पाकिस्तान, बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केलंह होतं. पण उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा संघ भारी पडला.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला पुन्हा उतरती कला लागली. भारताला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. पाकिस्तान आणि न्यूझीलंडने पराभूत केल्याने पुढचा मार्गच बंद झाला. जर तरच्या गणितातही भारत बसला नाही. त्यामुळे साखळी फेरीतच आशा संपुष्टात आल्या.
ऑस्ट्रेलिया खेळल्या गेलेल्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने दमदार सुरूवात केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा जेतेपदाचा मानकरी ठरेल असं वाटलं होतं. उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा मार्ग रोखला. इंग्लंडने भारताला 10 गडी राखून पराभूत केलं. इंग्लंडने अंतिम फेरीत पाकिस्तानला नमवलं आणि जेतेपद मिळवलं.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. सूर्यकुमार यादवचा झेल आणि सामन्याचं चित्र पालटलं होतं. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने जेतेपद मिळवलं होतं. सात पर्वात निराशा पदरी पडल्यानंतर नवव्या पर्वात यश मिळालं होतं. आता दहाव्या पर्वात तशाच कामगिरीची अपेक्षा टीम इंडियाकडून आहे.