राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा ९ फेब्रुवारीला आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळातील आपला एक जवळचा सहकारी आणि मित्र गमावल्याची भावना व्यक्त करत एकनाथ शिंदेंनी सर्व प्रकारचे नियोजित सोहळे रद्द केले आहेत.
मी माझा मित्र गमावला आहेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडिया आणि प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनाने झालेली हानी कधीही भरून येणारी नाही. या वेदनेतून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही. मी माझा एक कर्तव्यदक्ष सहकारी आणि मित्र गमावला आहे. अशा परिस्थितीत कोणताही सोहळा करणे मला उचित वाटत नाही. आपण सर्वांनी या परिस्थितीचे गांभीर्य राखून पवार कुटुंबाच्या दुःखात सहभागी व्हायला हवे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
कार्यकर्त्यांसाठी सूचना काय?
वाढदिवसानिमित्त होणारी गर्दी आणि उत्साह टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्ते, पक्षनेते आणि पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. शुभेच्छा देण्यासाठी कुणीही पुष्पगुच्छ किंवा महागड्या भेटी आणू नयेत. रस्ते किंवा सार्वजनिक ठिकाणी शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नयेत. तसेच केक कापणे किंवा इतर कोणतेही भव्य कार्यक्रम किंवा सार्वजनिक सोहळे आयोजित करू नयेत. वाढदिवसाचा खर्च टाळून तो निधी सामाजिक कार्यासाठी किंवा गरजूंना मदत करण्यासाठी वापरावा, असे संकेतही देण्यात आले आहेत.
एकनाथ शिंदेच्या संवेदनशीलतेचे कौतुकराज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे साऱ्या महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे यंदा ९ फेब्रुवारी रोजी मी वाढदिवस साजरा करणार नाही. या दिवशी कार्यकर्ते, पक्षनेते, पदाधिकारी आणि नागरिकांनी पुष्पगुच्छ, भेटी आणू नयेत, तसेच…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde)
या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रातून एकनाथ शिंदेच्या संवेदनशीलतेचे कौतुक होत आहे. येत्या ९ फेब्रुवारी रोजी त्यांच्या शासकीय निवासस्थानी किंवा इतर कुठेही वाढदिवसाचे सेलिब्रेशन होणार नसल्याचे अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले आहे.