टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदासाठी साखळी फेरीपासून चुरस निर्माण होणार आहे. साखळी फेरीतून सुपर 8 फेरीत जागा मिळवण्यासाठी संघ जीवाची बाजी लावणार यात काही शंका नाही. प्रत्येक सामन्यानंतर चित्र बदलणार आहे. 7 फेब्रुवारीला वर्ल्डकप स्पर्धेतील तीन सामने होणार आहेत. पाकिस्तान विरूद्ध नेदरलँड, वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलँड आणि भारत विरुद्ध अमेरिका सामना होणार आहे. भारत आणि अमेरिका सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. नाणेफेकीचा कौल हा 6.30 वाजता होईल. या सामन्यापासून टीम इंडिया स्पर्धेला सुरुवात करणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचं पारडं जड आहे. त्यामुळे भारतीय संघ हा सामना सहज जिंकेल असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. भारत अमेरिका सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानातील खेळपट्टी फलंदाजी की गोलंदाजीसाठी पुरक आहे, याबाबत चर्चा होत आहे. चला जाणून घेऊयात सविस्तरयय
मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील खेळपट्टी ही कायम फलंदाजीसाठी पूरक मानली जाते. खेळपट्टी सपाट असते आणि त्यामुळे चेंडू चांगला उसळी घेईल. तसेच फलंदाजांना फटके मारताना अडचण येणार नाही. हे मैदान तुलनेने छोटं असल्याने चौकार आणि षटकारांचा वर्षाव होणार हे नक्की.. टीम इंडियातील बहुतांश खेळाडू या मैदानात खेळून मोठे झाले आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेला या खेळपट्टीचा अंदाज आहे. 2 फेब्रुवारी 2025 रोजी भारताने शेवटचा टी20 सामना या मैदानावर खेळला होता. हा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात झाला. हा सामना भारताने 150 धावांनी जिंकला होता.
भारत अमेरिका सामन्यात हवामान स्वच्छ असणार आहे.आकाश निरभ्र असणार आहे. त्यामुळे या सामन्यात कसलाच खंड पडणार नाही. अक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, तापमान 32 अंश सेल्सिअर असेल. खेळपट्टी जरी फलंदाजीला पूरक असली तर नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा असणार आहे. त्याला कारणंही तसंच आहे. दुसऱ्या डावात दव पडणार हे निश्चित आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. दुसरीकडे, प्रथम फलंदाजी आली तर मोठी धावसंख्या करावी लागेल. कारण दुसऱ्या डावात धावा रोखणं गोलंदाजांना कठीण जाणार आहे.