सैराटनंतर खूप पैसे आले, अभिनेत्याची मोठी आर्थिक फसवणूक, जवळच्याच मित्रांनी पैसे उकळले अन् ...
abp majha web team February 07, 2026 06:13 PM

Tanaji galangude: नागराज मंजुळेंच्या सैराट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील सर्व गाण्यांसह आर्ची - परश्या - लंगड्या अशा सगळ्याच भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या होत्या. या चित्रपटात परश्याच्या मित्राची भूमिका साकारणारा अभिनेता तान्हाजी गालगुंडे घराघरात लोकप्रीय झाला. सैराटमध्ये काम केल्यानंतर त्याला अनेक सिनेमे मिळू लागले. पैसा मिळू लागला . मात्र, त्या काळात अनेकांनी त्याला आर्थिक बाबतीत फसवल्याचं त्याने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे. अचानक मिळालेल्या एवढ्या पैशाचं काय करायचं हे न कळल्यामुळे अनेकांनी फसवणूक केल्याची खंतही त्याने व्यक्त केली.

सैराट चित्रपटानंतर अभिनेता तानाजी गालंगुडे याचे 22 चित्रपट झाले. त्यातील 18 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. 

काय म्हणाला तान्हाजी गालंगुडे ? 

सकाळच्या एका पॉडकास्टमध्ये बोलताना तान्हाजी गालंगुडे म्हणाला," सैराट झाल्यानंतर माझ्याकडे चांगले पैसे यायला लागले होते. चांगले सिनेमेही मी केले. पैसे मिळायला लागले. पण त्या काळात माहीत नव्हतं की एवढ्या पैशांचं करायचं काय. आपलं पैशाबाबतीत फार अज्ञान असतं. गावाकडल्या लोकांना खरंच काही माहीत नसतं. याच काळात असे काही मित्र आले. ते म्हणाले आपण काहीतरी व्यवसाय करू. मग तू मला एवढे पैसे दे. काही जण म्हणाले एवढे पैसे दे तुला एवढे करून देतो. असे काही मित्र आले की मला पैशाची गरज आहे. तू मला दे मग तुला परत देतो. यामध्ये मग अशी वेळ आली की मी माझ्याजवळ काहीच पैसे ठेवले नाहीत. मी हात वर करून सगळे पैसे देऊन टाकले. पण, ती माणसं फक्त पैशासाठी आली होती. त्यांचा इतर दुसरा काहीच उद्देश नव्हता".

पैसे घेऊन गायब झाले...

पैसे घेतल्यानंतर हे सगळेजण गायब झाले. याचा मला प्रचंड मानसिक त्रासही झाला. ते नंतर माझे फोनही उचलत नव्हते. काहींनी मला ब्लॉक केलेलं. मी त्यांना मित्र म्हणून खूप जवळचं मानलं होतं. पण मी त्यातून एक गोष्ट शिकलो की तुला लाँग टर्म रिलेशन टिकवायचंय तर तू त्यांच्याशी व्यवहार नाही केला पाहिजे. व्यवहार जरी केला तरी तो एवढाच केला पाहिजे की त्या पैशाचा तुला फरक पडता कामा नये. म्हणजे तुझ्याकडे जर 10 लाख रुपये आहेत. तर तू 5 हजार रुपयांचाच व्यवहार एखाद्यासोबत केला पाहिजे. 10 लाखातले 5 हजार गेले तरी तुला फरक पडणार नाही. पण 10 लाख देऊन टाकले तर आपल्यासारखी माणसं संपूनच जातात. कारण एवढे पैसे कमावणं खूप अवघड आहे" असं तान्हाजी म्हणाला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.