भारतीय क्रिकेट संघाने विरारकर आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात शुक्रवारी 6 फेब्रुवारी रोजी इंग्लंडवर एकतर्फी फरकाने मात करत अंडर 19 वर्ल्ड कप 2026 ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताची अंडर 19 चॅम्पियन होण्याची ही सहावी वेळ ठरली. युवा भारतीय संघाचं या ऐतिहासिक विजयानंतर सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात आलं. या ऐतिहासिक विजयाच्या 2 दिवसानंतर कर्णधार आयुष म्हात्रे आणि भारतीय संघातील खेळाडू मायदेशी परतले. यावेळेस आयुष म्हात्रे आणि वर्ल्ड कप संघातील इतर खेळाडूंचं मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं.
आपल्या लाडक्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी मुंबईकर आणि क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली. तसेच आपल्या वर्ल्ड चॅम्पियन मुलांचं स्वागत करण्यासाठी आयुष आणि उपकर्णधार विहान मल्होत्रा याचे कुटुंबिय विमानतळावर उपस्थित होते. आयुषचं विमानतळावर आगमन होताचं त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं. आयुष आणि इतर सहकारी या अशा स्वागताने भारावून गेले होते. आयुषने या स्वागतानंतर माध्यमांसह संवाद साधला. आयुषने काय प्रतिक्रिया दिली? हे जाणून घेऊयात.
“खूप चांगल वाटतंय. देवाची कृपया आहे त्याने जिंकवलं”, असं म्हणत आयुषने आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच या विजयासाठी आभार मानत आयुषने देवाला याचं श्रेय दिलं. तसेच आयुषने माध्यमांसह बोलताना सिनिअर टीम इंडियासाठी खेळायचं ध्येय असल्याचं बोलून दाखवलं.
प्रत्येक क्रिकेटपटूचं देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न असतं. आयुषचंही इतर खेळाडूंप्रमाणेच देशासाठीच खेळायचं स्वप्न आहे. आयुषने त्याच्या नेतृत्वात भारताला वर्ल्ड कप जिंकवला. आता आयुषने पुढे काय करायचं ठरवलंय हे त्याने माध्यमांसह बोलताना सांगितलं. “आत्ता देशासाठी खेळायच आहे”, असं म्हणत आयुषने आपली इच्छा बोलून दाखवली.
मुंबईत भारतीय संघाचं जंगी स्वागत
दरम्यान टीम इंडियाने अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशी याने ऐतिहासिक खेळी केली. वैभवने 175 धावां केल्या. तर आयुषने 53 धावांचं योगदान दिलं होतं. भारताने या जोरावर 50 ओव्हरमध्ये 411 धावांचा डोंगर उभा केला होता. इंग्लंडने प्रत्युत्तरात केलेब फाल्कनर याच्या 115 आणि बेन डॉकिन्सच्या 66 धावांच्या जोरावर झुंज दिली. मात्र 412 धावांच्या महाकाय आव्हानासमोर इंग्लंड अपयशी ठरली. भारताने इंग्लंडला 40.2 ओव्हरमध्ये 311 रन्सवर गुंडाळलं. भारताने यासह 100 धावांनी सामना जिंकत वर्ल्ड कप चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला.