तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावरील मडकी वस्ती परिसरातील गणेश नगरातील तीन घरे चोरट्याने फोडून तीन लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. फिर्यादी संतोष रमाकांत जोशी हे पुण्यात भाचीचा विवाह असल्याने २० फेब्रुवारीला कुटुंबासह गेले होते. त्यांच्या घराशेजारील दोघेजण देखील त्याआधी परगावी गेले होते. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
बहिणीच्या पतीचे निधन झाल्याने विवाहाची जबाबदारी संतोष जोशी यांच्यावरच होती. त्यामुळे ते २० फेब्रुवारीला घराला कुलूप लावून कुटुंबासह पुण्याला गेले होते. गणेश नगरात ते तिसऱ्या माळ्यावर राहायला आहेत. त्यांच्याशेजारील चारजण राहायला आहेत. त्यातील दोघेजण त्याआधीच परगावी गेले होते. त्यांच्याही घराला कुलूप लावलेले होते. मागील चार दिवसांतच त्या तीन घरांमध्ये चोरी झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी अपार्टमेंटच्या प्रवेशद्वारावर व आतील बाजूला देखील सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याची बाब समजली.
अपार्टमेंटचे वॉल कंपाउंड खुजे असून त्यावर चढून कोणीही येऊ शकतो. पण, तेथे एक वॉचमन कायमचा नेमलेला असून त्याच्या राहण्याची सोय तेथेच करण्यात आलेली आहे. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली, पण मागील चार दिवसांत अनोळखी कोणी आला नसल्याचे वॉचमनने सांगितले. महामार्गाकडून अपार्टमेंटकडे जाणाऱ्या रोडवरील सीसीटीव्हीची पडताळणी पोलिस करीत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक श्री. क्षीरसागर तपास करीत आहेत.
पाच तोळे दागिने अन् रोकड चोरी
गणेश नगरातील फिर्यादी संतोष जोशी यांच्या घरातून तीन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, दीड ग्रॅमची सोन्याची अंगठी, दोन जोड कानातील टॉप्स, कानातील बटन रिंगा, लहान मुलाच्या गळ्यातील एक ग्रॅमचे बदाम, पाच हजार रुपये, एक पाकीट व आधारकार्ड, असा दोन लाख ३० हजारांचा ऐवज चोरीला गेला. तर अंबिका राजू गुंते यांच्या घरातून चार ग्रॅमचे कानातील टॉप्स आणि सिद्धेश्वर दिगंबर गोटे यांच्या घरातून सहा ग्रॅमची अंगठी, कानातील टॉप्स व साखळ्या (नऊ ग्रॅम), लहान बाळाच्या तीन अंगठ्या चोरीला गेल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.