आळंदी, ता. २६ : शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण’ या उपक्रमांतर्गत राज्यातील प्रेरणादायी कीर्तनकार वक्त्यांची कार्यशाळा आळंदी येथे आज उत्साहपूर्ण वातावरणात झाली. यावेळी वारकऱ्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण उपक्रमास पुढे नेण्यासाठी जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले. या प्रसंगी अखिल वारकरी गुरुकुल संघ तसेच राज्यातील वारकरी शिक्षण संस्थांचे सर्व अध्यापक आणि कीर्तनकार उपस्थित होते.
कार्यशाळेत विविध वारकरी शिक्षण संस्थांच्या प्रमुखांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी ‘राष्ट्रनिर्मितीची संस्कारमूल्ये’ या अभ्यासक्रम पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तिकेचे प्रकाशन झाल्यानंतर त्याची प्रत वाटण्यात आली. अनेक प्रमुख कीर्तनकारांनी शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश, अध्यापनातील पद्धतशीरता, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची जडणघडण तसेच आत्मसंरक्षणाबरोबर चारित्र्यनिर्मितीचे महत्त्व आपल्या भाषणात अधोरेखित केले. कार्यक्रमाचे संयोजन वारकरी संप्रदाय युवा मंचचे अध्यक्ष अक्षय भोसले यांनी केले. सूत्रसंचालन उमेश बागडे यांनी केले, तर आभार किशोर धुमाळ यांनी केले.