शाश्वत विकासातूनच ग्रामीण प्रगतीची खरी दिशा
esakal February 27, 2026 04:45 AM

नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) : ग्रामस्वच्छता, वृक्षलागवड आणि शाश्वत विकास हीच ग्रामीण प्रगतीची खरी दिशा आहे. प्रत्येक गावाने स्वच्छतेचा यज्ञ अखंडितपणे सुरू ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.

बेलापूर येथील सिडको भवन सभागृहात बुधवारी (ता. २५) आयोजित विभागस्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व महाआवास अभियान पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण विभागाचे राजाराम दिघे, व्याख्याते प्रशांत देशमुख, अपर आयुक्त (विकास) माणिक दिवे, सहाय्यक आयुक्त प्रदीप घोरपडे, तसेच कोकण विभागातील विविध जिल्ह्यांतील मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोरोनाकाळात २०१८ ते २०२४ या कालावधीतील पुरस्कार वितरण प्रलंबित राहिले होते; मात्र पुरस्कारांच्या प्रतीक्षेत न राहता गावांनी स्वच्छतेची चळवळ सातत्याने जिवंत ठेवली, ही बाब कौतुकास्पद असल्याचे सांगत डॉ. सूर्यवंशी यांनी सर्व ग्रामपंचायतींचे अभिनंदन केले. ग्रामस्वच्छता अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील आरोग्य सुधारणा, पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवड यांना चालना देणे हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक ग्रामसभेत संत गाडगेबाबांची ग्रामगीता दर्शनी भागात लावावी, असे आवाहन करत त्यांनी ग्रामगीतेतील १७व्या अध्यायाचे महत्त्व अधोरेखित केले. व्याख्याते प्रशांत देशमुख यांनी वृक्षलागवडीचे वैश्विक महत्त्व विशद करताना संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा संदर्भ देत, एक झाड लावणे म्हणजे विश्वाशी नाते जोडणे, असे प्रभावी मत मांडले. यानंतर विभागीय आयुक्तांच्या हस्ते संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा व महाआवास अभियानातील विविध वर्षांतील विजेत्या ग्रामपंचायती व जिल्हा परिषदांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पंतप्रधान आवास योजना व राज्य पुरस्कृत आवास योजनांअंतर्गत पालघर, रायगड, रत्नागिरी व ठाणे जिल्हा परिषदांना विविध वर्षांतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार माधुरी डोंगरे यांनी केले.

या ग्रामपंचायतींचा गौरव
२०१८-१९ या वर्षामध्ये प्रथम आलेल्या विजेत्या ग्रामपंचायतींमध्ये हुमरस (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग), २०१९-२०२० साठी बापाडे (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग), २०२२-२०२३ साठी खामशेत (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) यांचा समावेश आहे. तर विशेष पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीमध्ये शिवकर (ता. पनवेल, जि. रायगड), टेंभी (ता. वसई, जि. पालघर), वडवळ (ता. खालापूर, जि. रायगड) यांचा समावेश आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.