विद्यार्थी रमले ‘शब्दांच्या गावात’
अंबरनाथमध्ये घुमला मराठी भाषेचा जयघोष; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रेरणादायी उपक्रम
अंबरनाथ, ता. २६ (वार्ताहर) : घेऊया एकच वसा, मराठीला बनवूया ज्ञानभाषा या संकल्पनेवर आधारित अंबरनाथमध्ये मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अंबरनाथ नगर परिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय आणि महात्मा गांधी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी अक्षरशः शब्दांच्या विश्वात हरवून गेले होते.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला तो सुप्रसिद्ध वृत्तनिवेदिका व सुसंवादक दीपाली केळकर यांचा ‘शब्दांच्या गावा जावे’ हा विशेष कार्यक्रम. केळकर यांनी इयत्ता आठवी आणि नववीच्या सुमारे ४५० विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, शब्दांची विविध रूपे आणि त्यांचा स्वभाव उलगडून दाखवला. अभिव्यक्तीची ताकद आणि भाषेचे सौंदर्य यावर ओघवत्या भाषेत मार्गदर्शन केले. मराठी ही केवळ बोलीभाषा न राहता ती ‘ज्ञानभाषा’ व्हावी, यासाठी वाचन आणि शुद्ध लेखनाचा आग्रह धरण्याचे आवाहन केले.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या बहारदार नृत्याने झाली, ज्यातून मराठी संस्कृतीचे दर्शन घडले. संगीत शिक्षिका स्वरदा गोखले यांनी मराठी भाषेचा गौरव करणारे नवगीत सादर करून वातावरणात चैतन्य भरले. तसेच, इयत्ता नववीतील विद्यार्थिनी पल्लवी डोंबाळे हिने मराठी भाषेच्या जतनाबाबत प्रभावी मनोगत व्यक्त केले.
मार्गदर्शन
नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड व नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. ग्रंथपाल तपस्या नेवे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. या वेळी उपमुख्याध्यापक राजेश रोहिदास, पर्यवेक्षक तुषार सोनजे, नोडल अधिकारी स्वप्नील जाधव आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षिका वैशाली जोशी यांनी सूत्रसंचालन केले.