27740
लढणाऱ्यांच्या विजयाची पुनरावृत्ती होईल
वैभव नाईक : कुडाळात शिवसेना ठाकरे गटातर्फे उमेदवारांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ : ‘‘काही निवडणुका जिंकण्यापेक्षा लढण्यासाठी असतात आणि आपल्या लढवय्या उमेदवारांनी ही निवडणूक लढवून हिंमत दाखवली. लढणाऱ्यांचा विजय होतो, हा इतिहास आहे. त्याची नक्कीच पुनरावृत्ती होईल,’’ असे प्रतिपादन माजी आमदार वैभव नाईक यांनी येथे केले.
ठाकरे शिवसेनेच्या तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज माजी आमदार नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील महालक्ष्मी हॉल येथे झाली. याप्रसंगी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी आणि पराभूत झालेल्या पक्षांच्या सर्व लढवय्या उमेदवारांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी नाईक बोलत होते.
पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अमरसेन सावंत, उपनेत्या जान्हवी सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, सचिन कदम, तालुका उपप्रमुख बाळा कोरगावकर, बाळू पालव, महेश सावंत, शहरप्रमुख संतोष शिरसाट, शहर निरीक्षक सुशील चिंदरकर, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, रुपेश पावसकर, माजी उपसभापती जयभारत पालव आदी उपस्थित होते.
श्री नाईक म्हणाले, ‘‘जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत २५ जागा बिनविरोध झाल्या. आपल्या मतदारसंघातील उमेदवारांनाही लाखो रुपयांचे आमिष देऊन त्यांना फोडण्याचे आणि दडपण्याचे प्रयत्न झाले. मात्र, सर्वजण शिवसेना ठाकरे गटाशी प्रामाणिक राहिले. लढणाऱ्यांचा विजय होतो, हा इतिहास आहे. त्याची नक्कीच पुनरावृत्ती होईल. काहींचा फार कमी मतांनी पराभव झाला, पराभवाने खचून जाऊ नये. महायुतीची केंद्रात राज्यात सत्ता आहे, तरी या निवडणुकीत मतदारसंघातील ५० हजार लोकांनी आपल्यावर विश्वास दाखविला आहे. सत्ताधारी आमदार असलेल्या पक्षाला आपल्यापेक्षा केवळ १ हजार मतेच जास्त मिळाली. कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहण्याचा मी शब्द दिला होता. त्याप्रमाणे आपल्या पाठीशी राहण्याचे काम केले. यापुढेही आपल्या पाठीशी राहणार आहे.’’
----------
‘जनतेच्या डोळ्यांत केवळ धूळफेक’
उपरकर म्हणाले, ‘‘शिवसेनेने अनेकदा विरोधी पक्षात राहून काम केले आहे. आपण सर्व उमेदवारांनी निवडणुकीत दिलेला लढा उल्लेखनीय आहे. यापुढेही सर्वांनी ताठ मानेने लढलं पाहिजे, लोकसंपर्क ठेवला पाहिजे, लोकांची छोटी-मोठी कामे केली पाहिजेत. आज जिल्ह्यात आरोग्य सुविधा, अवैध धंदे, खड्डेमय रस्ते, बंद केल्या जाणाऱ्या शाळा, आंबा-काजूचे नुकसान असे अनेक प्रश्न आहेत. सत्ताधाऱ्यांना हे प्रश्न सोडविता आले नाहीत. त्यामुळे जनता सत्ताधाऱ्यांवर नाराज आहे. त्या जनतेचा आवाज आपण बनले पाहिजे. येथील स्थानिक आमदार विधानसभा सभागृहात वेगळं बोलतात आणि जिल्ह्यात येऊन दुसरं बोलतात. एकाच घरात पालकमंत्री, सत्ताधारी खासदार, आमदार असताना जिल्ह्यातील प्रश्न का सुटत नाहीत, हा खरा प्रश्न आहे. जनतेच्या डोळ्यात केवळ धूळफेक करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे.’’