'महाराष्ट्र केसरी'च्या आखाड्यात शहरातील तालमींची माती
esakal March 02, 2026 04:45 AM

चिंचवड, ता. १ ः राज्यातील सर्वोच्च मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात अभिमानास्पद उपक्रम पार पडला. शहरातील सुमारे ३० गावांमधील तालमींमधील मुठभर पवित्र लाल माती प्रमाणात एकत्र करून ती कलशात संकलित करण्यात आली. सोमवारी (ता. २) वाघोलीत कलशाचे पूजन करून ‘महाराष्ट्र केसरी’च्या मुख्य आखाड्यात ही माती विधीवत मिसळण्यात येईल.
पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या पुढाकाराने आयोजित हा उपक्रम राबविण्यात आला. कुस्ती परंपरेची एकता, आखाड्यांचा सन्मान आणि पैलवानांच्या मेहनतीचे प्रतीक म्हणून लाल मातीचे पूजन करण्यात आले. ‘ही केवळ माती नसून शहराच्या संस्कार, परंपरा आणि पैलवानांच्या घामाचे प्रतीक आहे,’ अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. बोपखेल, दिघी, चऱ्होली, डुडुळगाव, मोशी, चिखली, तळवडे, भोसरी, निगडी, आकुर्डी, किवळे, रावेत, पुनावळे, वाकड, ताथवडे, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी, सांगवी, पिंपळे गुरव, वैदूवस्ती, वाल्हेकरवाडी, पिंपरी, चिंचवड, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, खराळवाडी आदी भागांतील तालमींमधील माती संकलित करण्यात आली. चिंचवडगावातील गांधी पेठ तालमीत उत्साहपूर्ण वातावरणात ती कलशात एकत्रित करण्यात आली.
संघाचे अध्यक्ष हनुमंत भाऊ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. यावेळी माजी नगरसेवक राजू गोलांडे, ‘भारत केसरी’ विजय गावडे, शशिकांत घुले आदींनी उपक्रमाची प्रशंसा केली. यावेळी विविध तालमींचे वस्ताद, पैलवान, कुस्तीप्रेमी तसेच संघाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. संतोष माचुत्रे यांनी प्रास्ताविक केले. काळुराम कवितके यांनी सूत्रसंचालन केले. सौरभ कामथे यांनी आभार मानले.
---

‘तालमींचे अस्तित्व टिकले पाहिजे’
पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष हनुमंत गावडे यांनी सांगितले की, कुस्तीचा वारसा जपण्यासाठी तालमींचे अस्तित्व टिकवणे आवश्यक आहे. शहरातील अनेक मल्लांनी राज्यस्तरीय स्पर्धांत पदकांची कमाई केली आहे. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी चमकदार कामगिरीसह शहराचे नाव उंचावले आहे. शहरातील काही तालमींमध्ये सुरू असलेले कुस्ती संकुल आणि नियमित सरावाची परंपरा हे याचे महत्त्वाचे कारण आहे. अनेक होतकरू खेळाडू प्रगत प्रशिक्षणासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, दिल्ली, हरियाणा, पंजाब आदी ठिकाणी जाऊन सराव करतात. तेथील शिबिरे झाल्यानंतर ते पुन्हा परत येऊन तालमीत नवोदित मल्लांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे कुस्तीची परंपरा अधिक बळकट होत आहे. मात्र, सध्या शहरातील सुमारे ३० टक्के तालीम बंद पडल्या आहेत. तालमींचे संकुलात रूपांतर होणे हे यामागील प्रमुख कारण असून ही स्थिती केवळ पिंपरी चिंचवडपुरती मर्यादित नसून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे तालमींचे अस्तित्व टिकले पाहिजे.
---

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.