केवासीअभावी रखडणार घरकुलाचा हप्ता
esakal March 02, 2026 11:45 AM

कळस, ता. १ : प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकूल मंजूर झालेल्या इंदापूर तालुक्यातील सुमारे दीड हजार लाभार्थ्यांना ई-केवायसी केल्याशिवाय पहिला हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या घरकुल अनुदानाचे वितरण ‘स्पर्श’ या नवीन संगणकीय प्रणालीद्वारे केले जात आहे. या प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले असणे आणि ते ‘डीबीटी’साठी सक्रिय असणे अनिवार्य आहे. ज्या लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही, त्यांचे हप्ते सिस्टीममध्ये अडकून पडत आहेत. यामुळे लाभ थेट खात्यात मिळवण्यासाठी तालुक्यातील सुमारे दीड हजार लाभार्थ्यांना आधार सीडिंग आणि सक्रिय डीबीटी करण्याची गरज आहे.
सन २०२४-२५ व २०२५- २६ या वर्षांत प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झालेल्या परंतु पहिला हप्ता न मिळालेल्या तालुक्यातील १ हजार ४८८ लाभार्थ्यांची केवायसी करणे बंधनकारक झाले आहे. नावातील त्रूटी दुर करणे, आधारशी बँक खाते जोडणे, डीबीटी सक्रिय करणे यांसारख्या बाबींची पूर्तता करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी केले आहे.
ते म्हणाले, प्रधानमंत्री घरकुल योजनेतंर्गत घरकूल मंजूर झालेल्या परंतु पहिला हप्ता न मिळालेल्या तब्बल १४८८ लाभार्थ्यांनी अद्याप आधार ''केवायसी'' आणि ''डीबीटी'' इनेबल प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. यामुळे या लाभार्थ्यांचे घरकुलाचे हप्ते तांत्रिक अडचणीत सापडले आहेत. परिणामी त्यांना अनुदान मिळण्यास विलंब होत आहे. लाभार्थ्यांनी स्वतःच्या बँक शाखेत जाऊन आधार केवायसी करून घ्यावे आणि खाते डीबीटी इनेबल असल्याची खात्री करावी. या लाभार्थ्यांनी तातडीने आपली बँक खाते अपडेट करणे गरजेचे आहे. याशिवाय थेट पोस्टात खाते उघडणेही सोईचे आहे. अधिक माहितीसाठी संबंधित लाभार्थ्यांनी ग्रामसेवकाशी संपर्क साधण्याचे आवाहन गटविकास अधिकारी खुडे यांनी केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.