बारामती, ता. १ : येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हजरत चाँदशाहवली बाबांचा पारंपरिक उरूस यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी साध्या धार्मिक कार्यक्रमास मान्यता देण्यात आली आहे.
बाबांच्या दर्ग्यात आज झालेल्या ट्रस्टी व मानकरी यांच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ जानेवारी रोजी अपघाती निधन झाल्यानंतर बारामतीत शोककळा पसरली आहे. शहरात सर्वत्र दुःखाचे वातावरण असताना उत्साहपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम घेणे उचित ठरणार नसल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली.
दरवर्षी हजरत चाँदशाहवली बाबांच्या उरुसामध्ये हिंदू व मुस्लिम समाजातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. श्रद्धा, सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देणारा हा सोहळा बारामतीच्या सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानला जातो.
यंदा मात्र सामाजिक संवेदनशीलता जपत केवळ धार्मिक विधी, प्रार्थना व दुवा कार्यक्रम साध्या पद्धतीने पार पडणार असल्याचे उरूस कमिटीच्या सदस्यांनी सांगितले. समाजातील सर्व घटक शोकभावनेत एकत्र असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.