गुलजारी नदीच्या संवर्धनाचा निर्धार
शोषखड्डे खोदण्यास ग्रामपंचायतीकडून सुरुवात
कासा, ता. ३ (बातमीदार) ः चारोटी नाका परिसरात हॉटेल तसेच कोंबडी-मटण विक्रेत्यांच्या दुकानांतील वाहत असलेले सांडपाणी गुलजारी नदीच्या पात्रात मिसळण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायतीने तातडीने शोषखड्डे खोदण्यास सुरुवात केली आहे.
चारोटी ग्रामपंचायत दररोज स्वच्छता वाहन, कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता मोहीम राबवते; मात्र रात्रीच्या वेळी काही व्यावसायिक कचरा व सांडपाणी रस्त्यालगत टाकत असल्याने सार्वजनिक आरोग्यावर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत होती. याच अनुषंगाने ग्रामविकास अधिकाऱ्यांनी संबंधित हॉटेल मालक तसेच कोंबडी विक्रेत्यांना सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच नदीपात्र अस्वच्छ होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी सातत्याने पाहणी केली जात आहे.
-------------------------------
ग्रामपंचायतीकडून आवाहन
जिल्हाभरात स्वच्छता अभियान, प्लॅस्टिकमुक्त मोहीम तसेच नदी स्वच्छता उपक्रम राबवले जात आहेत. अशा परिस्थितीत हॉटेल व्यावसायिकांसह नागरिकांनीही स्वच्छतेबाबत जबाबदारी स्वीकारून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.
------------------
चारोटी नाका येथील संबंधितांना स्वच्छतेबाबत नोटिसा दिल्या आहेत. नियमांचे पालन केले नाही तर पुढील कारवाई केली जाईल.
- प्रणय मेहेर, उपसरपंच, चारोटी ग्रामपंचायत