मुंबई, 4 मार्च 2026 : मुंबई आणि विजयदुर्ग दरम्यान रो-रो सेवा 1 मार्च 2026 रोजी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सेवेचे उद्घाटन केले. ही सेवा समुद्री प्रवासासाठी जलद आणि अधिक आरामदायी पर्याय आहे. अशातच आता मुंबई ते विजयदुर्ग या सागरी रो-रो सेवेला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री योगेश कदम यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोकणात जाणाऱ्यांना फायदा होणारमुंबई ते कोकण प्रवास अधिक जलद आणि सुलभ व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत मुंबई ते विजयदुर्ग ही रो-रो सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे मुंबई–कोकण दरम्यान सागरी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होऊन प्रवाशांना प्रवासाचा चांगला पर्याय मिळणार आहे. त्यामुळे ही सेवा कोकणात जाणाऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. या सेवेला हर्णे बंदर येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी मंत्री कदम यांनी केली आहे.
योगेश कदम यांचे निवेदनराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथे सध्या जेट्टीचे बांधकाम सुरू आहे. दापोली तालुक्यात रेल्वे मार्गाची सुविधा नसल्याने येथील नागरिकांना मुंबईसह इतर भागात जाण्यासाठी प्रामुख्याने रस्ते किंवा सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवेला हर्णे बंदर येथे थांबा दिल्यास दापोली तालुक्यासह परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल.
तसेच कोकणातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी सागरी मार्ग अधिक सोयीस्कर होईल आणि स्थानिक स्तरावर सागरी वाहतुकीला चालना मिळेल, त्यामुळे मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवेला हर्णे बंदर (ता. दापोली) येथे थांबा देण्याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता मंत्री नितेश राणे यावर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.