चास, ता. ४ : चास-कमान धरणाच्या कालव्याचे ० ते ७२ किलोमीटर अंतराचे अस्तरीकरण रखडवणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्याचे काम काढून घेण्याची मागणी खेड-आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेत केली. खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी नापिकीच्या उंबरठ्यावर असून, जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढचे काम करू न देण्याचा इशाराही त्यांनी दिला.
आमदार काळे म्हणाले की, कालव्याच्या ० ते ७२ किमी अंतरात मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने ४५० ते ५०० क्युसेकने सोडलेले पाणी शिरूरपर्यंत पोहोचत नाही. ३० दिवसांचे आवर्तन ४५ दिवस चालूनही शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. या कामाचे निविदा निघूनही कंत्राटदाराने अद्याप काम सुरू केलेले नाही. यात काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय व्यक्त करत, त्यांनी संबंधित मंत्र्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
कमकुवत झालेले पूल गळतीला कारणीभूत
खेड तालुक्यातील गळती थांबवण्याऐवजी सरकार पुढच्या टप्प्यातील कामाची घाई का करत आहे? तसेच, ओढ्यांवरील जुने व कमकुवत झालेले पूल गळतीला कारणीभूत ठरत असून, त्यांचे तातडीने रचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) करून नवीन पूल बांधण्याची मागणीही आमदार काळे यांनी केली. शेतकऱ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.