मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधिमंडळाच्या आवारात माध्यमांसोबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण शक्य नसल्याचं म्हटलं. ज्या नेत्यासोबत विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या, तो नेताच आता हयात नसल्यानं विलिनीकरणाची शक्यता आता नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर राज्यसभेचा अर्ज दाखल केला. भाजपनं चार, शिवसेनेनं एक, राष्ट्रवादीनं एक आणि मविआनं एक उमेदवार दिल्यानं राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकीकडे राज्यसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न झाल्याची माहिती राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यानं केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यानं मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्यसभेचा अर्ज भरण्याच्या सात दिवस आधी सुद्धा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न करण्यात आला होता. मविआकडून शरद पवार यांना उमेदवारी दिली गेली तर विलिनीकरणाचे सगळे मार्ग बंद होणार त्यामुळे अजूनही विचार करता येईल, अशा स्वरापाचा तो प्रस्ताव होता.
शरद पवार यांना संयुक्त राष्ट्रवादीकडून राज्यसभेची 6 वर्षांची टर्म दिली जावी.तर पार्थ पवार यांना सुनेत्रा पवार यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर उमेदवारी दिली जावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना देण्यात आला होता. मात्र, राष्ट्रवादी पक्षाकडून यावर कोणतेच उत्तर न आल्याने अखेर शरदचंद्र पवार पक्षाने मविआकडून उमेदवारी घेत अर्ज भरला आणि आता ही निवडणूक बिनविरोध होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडून मविआतर्फे म्हणजेच पक्षाच्यावतीनं एक आणि अपक्ष म्हणून एक असा अर्ज शरद पवारांनी दाखल केला आहे. महाविकास आघाडीच्या इतर घटकपक्षांनी देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर पाठिंब्याबाबत निर्णय घेतला. अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसकडून राज्यसभेसाठी मविआकडून शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण 19 जण निवडून जातात. त्या 19 जणांपैकी 7 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. राज्यसभेच्या एकूण 37 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. राज्यसभेसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. त्यापूर्वीच महाराष्ट्रातून राजकीय पक्षांनी 7 जणांच्या नावाची घोषणा केल्यानं निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आणखी वाचा