नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta bannerji) आणि केंद्रातील मोदी सरकारमधील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दार्जिलिंग दौऱ्यात ममता बॅनर्जी यांच्याकडून राष्ट्रपतींचा अवमान करण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) म्हटलं आहे. राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागताला मुख्यमंत्री आल्या नाहीत. याशिवाय येथील आंतरराष्ट्रीय संताल सम्मेलनाच्या जागेवरूनही वाद झाल्याचं पाहायला मिळालं. या संमेलानासाठी आलेल्या राष्ट्रपतींनी थेट जाहीर भाषणात आपली नाराजी बोलून दाखवली. हा कार्यक्रम अशा ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे, जिथे संताल समाजाचे लोक सहज पोहचू शकणार नाहीत, अशी नाराजी राष्ट्रपतींनी बोलून दाखवली.
पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग येथ आयोजित कार्यक्रमासाठी राष्ट्रपती राज्यात आल्यानंतरही त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बनर्जी किंवा त्यांच्या सरकारकडून कोणीही मंत्री आला नसल्याची खंत राष्ट्रपती मुर्मू यांनी बोलून दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत खंत आणि नाराजी व्यक्त केली आहे.
लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या तसेच आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणावर श्रद्धा असलेल्या सर्व नागरिकांसाठी ही घटना लज्जास्पद आणि अभूतपूर्व असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली. आदिवासी समाजातून आलेल्या राष्ट्रपतींनी स्वतः व्यक्त केलेल्या वेदना आणि संतापामुळे देशातील जनतेच्या मनात मोठी खंत असून दुःख झालं आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या, राष्ट्रपतींचा झालेला हा अपमान राज्यातील प्रशासनामुळेच घडल्याचे मोदींनी ट्विटरवरुन म्हटलं आहे. संताल संस्कृतीसारख्या महत्त्वाच्या विषयाकडे पश्चिम बंगाल सरकारने अत्यंत हलगर्जीपणे पाहिले. राष्ट्रपती हे पद राजकारणापलिकडचे असून त्या पदाची प्रतिष्ठा आणि पावित्र्य कायम राखले गेले पाहिजे. पश्चिम बंगाल सरकार आणि तृणमूल काँग्रेसला यापुढे तरी सुबुद्धी येईल, अशा संतप्त आणि उपरोधात्मक भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही दार्जिलिंगमधील कार्यक्रमात थेट नाराजी व्यक्त केली. ममता बॅनर्जी माझ्या लहान बहिणीसारख्या आहेत, मी देखील प. बंगालची कन्या आहे. त्या नाराज आहेत की नाही हे मला माहिती नाही. पण, त्याने काही फरक पडत नाही. संताल समाजासाठीचा आजचा कार्यक्रम बिधाननगर येथून गोशाईपुरला स्थलांतरीत का करण्यात आला. येथे लोकांची उपस्थिती कमी दिसली. मात्र, हा कार्यक्रम बिधाननगरमध्ये झाला असता, तर जास्त संख्येने समाजबांधव आले असते, अशी खंत मुर्मू यांनी बोलून दाखवली.
आणखी वाचा